शेतकरी संघटनेने शेतजमीन लिलाव पाडले बंद

वडिलांच्या आजारपणामुळे खर्च वाढला. मी बँकेचे कर्ज बुडविणार नाही, एक एक रुपया भरणार आहे. पीकपाणी बरे नसल्याने ही वेळ आली आहे. बँकेने मुदत द्यावी. वडील अत्यंत आजारी आहेत, अशा परिस्थितीत बॅंकेने समजून घ्यावे. - राजेंद्र कोटमे, कर्जदाराचा मुलगा,कोटमगाव विठ्ठलाचे, ता. येवला
शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले
शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले

नाशिक: सरकारने दुष्काळी परिस्थितीत कुठलीही वसुली करू नये, असे सरकारने सांगितले असतानाही जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव करण्याचा घाट घातला.यापूर्वीच जिल्ह्यातील गिरणारे, शिलापूर, जळगाव नेऊर या गावांमध्ये जमिनीचा लिलाव शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने लिलाव बंद पडले होते. असे असतानाही मंगळवारी (ता. ४) कोटमगाव (ता. येवला) येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा बॅंकेकडून होणारा लिलाव शेतकरी संघटनेने बंद पाडला. या वेळी गावकऱ्यांनी गावात 'वसुली अधिकाऱ्यांना गावबंदी' असे फलक लावून विरोध केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की येवला तालुक्यातील कोटमगाव विठ्ठलाचे येथील शेतकरी मुरलीधर गोपीनाथ कोटमे यांनी २०११ मध्ये गृहकर्ज म्हणून १३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र पुढे त्यांना काही महिन्यांत अर्धांगवायूचा आजार झाला. त्यामुळे आजारपणाच्या खर्चात कुटुंबाची ओढाताण झाली. त्यामुळे परतफेड होऊ शकली नाही व त्यामुळे घेतलेल्या कर्जाचा व्याजासह आकडा फुगत गेला. कर्जासह व्याजाची रक्कम ३० लाख रुपये झाली. यादरम्यान त्यांचा मुलगा राजेंद्र हा शेती पाहत होता. त्यालाही पीक साधले नाही, बाजरभाव पडल्याने व नैसर्गिक अपात्तीमुळे मी कर्ज भरू शकलो नाही. सध्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे, बँकेने समजून घ्यावे असे मुरलीधर कोटमे यांचा राजेंद्र याने संपर्क साधला असता सांगितले.    एकीने लढा देण्याचा शेतकऱ्यांनी ेकेला निर्धार (video)

कर्जाची वेळेवर परतफेड न झाल्याने अखेर जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी मंगळवारी (ता. ४) शेतजमिनीचा लिलाव ठेवला होता. जिल्हा बँकेकडून चार जणांचे पथक नाशिकवरून लिलावासाठी आले होते. त्यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त ही होता. मात्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गावात येऊन बसल्याने गोची झाली. कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अधिकऱ्यांना घेराव घातला होता. या वेळी शेतकऱ्यांनी वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावबंदी असल्याचे दरडावून सांगत कडाडून विरोध केला. या वेळी जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीला टाळे ठोकले. यामुळे कुणीही लिलावाच्या बोलीसाठी आले नाही.

या वेळी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा निर्मला जगझाप, शेतकरी नेते संतू पाटील झांबरे, अरुण जाधव, बापू पगारे, सुभाष सोनवणे, शिवाजी वाघ यांसह गावातील ग्रामस्थ व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया   शेतकरी अडचणीत आहे. सरकारने दुष्काळी परिस्थितीत कुठलीही वसुली करू नये, असे आदेश काढले असताना बँक मनमानी करत आहे. यापूर्वी शेतजमिनीचे लिलाव थांबविण्यासाठी ‘वसुली अधिकाऱ्यांना गावबंदी'' असा इशारा दिला असून, लिलाव बंद पडले आहेत. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, नाहीतर आम्ही भूमिका घेऊन धडा शिकवू. - निर्मला जगझाप, माजी प्रांतिक अध्यक्ष, शेतकरी संघटना- महिला आघाडी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com