सिंधुदुर्गचा काजू उद्योग कोलमडला

सिंधुदुर्गचा काजू उद्योग कोलमडला
सिंधुदुर्गचा काजू उद्योग कोलमडला

सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग : काजूवरील आयात शुल्क कमी झाल्याचा मोठा फटका सिंधुदुर्गातील काजू उद्योगाला बसला आहे. परदेशातील कच्चा काजू दाखल झाल्याने काजू गराचा दर उतरला आहे. यामुळे जिल्ह्यातील काजू व्यावसायिकांना उत्पादन खर्चही मिळवणे कठीण बनले आहे. याचा परिणाम येत्या काजू हंगामातील खरेदीवर दिसण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास गेल्या तीन वर्षात काजू दर वाढल्याने काजू बागायतीत गुंतवणूक केलेले बागायतदार अडचणीत येणार आहेत.  गेली दोन वर्षे कच्च्या काजूचा दर १७० ते १७५ रुपये प्रतिकिलो असा मिळत होता. पूर्वी हा दर ८० ते १०० रुपये असायचा. ब्राझीलसह इतर देशातून मोठ्या प्रमाणात काजू बीची आयात होत असे; मात्र केंद्राने आयात शुल्क ५ टक्‍के केल्यामुळे ही आयात नियंत्रित झाली होती. साहजिकच स्थानिक काजू बीला चांगला दर मिळत होता. काजूचे वाढलेले मार्केट पाहून सिंधुदुर्गात अनेक शेतकऱ्यांनी भातशेतीजमिनीसह डोंगर भागात काजूची लागवड केली. गेल्या अर्थसंकल्पात केंद्राने काजूवरील आयात शुल्क कमी करत अडीच टक्‍क्‍यावर आणले. जिल्ह्यातील काजू कारखानदारांनी याआधीच स्थानिक काजूची १७० ते १७५ इतक्‍या सरासरी दराने खरेदी केली होती. साधारण १ किलो काजू गरांसाठी ४ किलो काजू बी व प्रक्रिया शुल्क मिळून किमान ८०० रुपये खर्च येतो. यामुळे मुद्दल सुटायला इतका तरी दर मिळणे गरजेचे असते.  गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रासह गोव्यात ब्राझील व इतर भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा काजू दाखल झाला आहे. याचा दर ८० ते ८५ रुपये प्रतीकिलो इतका कमी आहे. त्यापासून तयार केलेला काजू गोव्याच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाला. तामिळनाडू आणि केरळमधील प्रक्रिया उद्योजकांनी हा काजू गोव्यात उतरवला आहे. याचा दर प्रतििकलो ७२० च्या दरम्यान आहे. साहजिकच कोकणातील दर्जेदार काजूचा दर पडला. आता नव्याने काजू हंगाम सुरू होणार आहे. या परिस्थितीचा सगळ्यात मोठा फटका कच्च्या काजूच्या खरेदीवर होण्याची भीती आहे. गेली दोन वर्षे १५० ते १७५ इतक्‍या सरासरीने मिळणारा दर १०० च्या घरात येण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. सिंधुदुर्गचा ब्रॅंड टिकवणे मोठे आव्हान  गोवा आणि मुंबई असे काजूची दोन मोठे मार्केट आहेत. परदेशातून आणलेल्या काजू बियांची चव कोकणातील काजूच्या तुलनेत दर्जाहीन असते. गोव्यात दर्जाचा फारसा विचार केला जात नाही; मात्र मुंबई मार्केटमध्ये दर्जा पाहिला जातो. त्यामुळे कोकणातील काजूची मुंबईत मक्‍तेदारी आहे. अलीकडच्या काळात दर कमी झाल्याने कोकणातून गेलेल्या काही मालात परदेशी काजूची भेसळ झाली. यामुळे काही माल रिजेक्‍ट होऊन परत आला. काहींनी मात्र नुकसान सोसूनही दर्जा कायम ठेवला. असे असले तरी दराच्या या कसरतीत सिंधुदुर्गाचा काजू ब्रॅंड टिकवणे मोठे आव्हान ठरणार आहे. उद्योगाची व्याप्ती

  •  देशातील लागवडीखालील क्षेत्र - १०.२७ लाख हेक्‍टर
  •  देशातील सरासरी उत्पादन - साडेसात लाख टन
  •  देशातील प्रतिहेक्‍टरी उत्पादकता - ७०० ते ८०० किलो
  •  महाराष्ट्रातील काजू लागवड क्षेत्र - १.८६ लाख हेक्‍टर
  •  सिंधुदुर्गातील काजू लागवडीखालील क्षेत्र - ६० हजार हेक्‍टर
  •  महाराष्ट्रातील उत्पादन - २ लाख टनांपेक्षा जास्त
  •  महाराष्ट्रातील उत्पादकता - १२०० ते १३०० किलो प्रतिहेक्‍टर
  •  कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या जाती : वेंगुर्ले १, वेंगुर्ले ४, वेंगुर्ले ६, वेंगुर्ले ७, वेंगुर्ले ८, वेंगुर्ले ९
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com