कर्जमाफीसह इतर योजनांविषयी शिवसेनेचे सत्यशोधन आंदोलन

कर्जमाफीसह इतर योजनांविषयी शिवसेनेचे सत्यशोधन आंदोलन
कर्जमाफीसह इतर योजनांविषयी शिवसेनेचे सत्यशोधन आंदोलन

औरंगाबाद: छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, मुद्रा कर्ज आदी शासनाने केलेल्या विविध घोषणांचा खरोखर शेतकऱ्यांना व नवउद्योग उभारू इच्छिणाऱ्या किती लोकांना लाभ मिळाला, यासाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी (ता. ९) सत्यशोधन आंदोलन करण्यात आले. सिडको परिसरातील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी "फसवी कर्जमाफी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', "भांडवलदार धार्जिण्या बॅंकांचा धिक्कार असो', "शेतकऱ्यांचा सात - बारा कोरा झालाच पाहिजे', "शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेच पाहिजे' अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला. किती कर्जमाफी अर्ज आले. त्यापैकी किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मुद्रा, स्टॅण्डअप योजनांचे अर्ज आले व लाभाची स्थिती काय आदी प्रश्‍न या वेळी लीड बॅंक मॅनेजर प्रदीप कुतवळ यांच्यासमोर श्री. दानवे यांनी मांडले.

श्री. कुतवळ म्हणाले, की आतापर्यंत नऊ ग्रीन लिस्ट सरकारकडून प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी लिड बॅंकेकडे दिलेल्या याद्यानुसार ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी अर्ज आले. त्यापैकी १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले. ८२ हजार ३२३ शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळाला, तर ८१ हजार २५७ शेतकऱ्यांना ४५ कोटी ८२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली. ३० हजार ४१० शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापेक्षा जास्त असल्याने वरची रक्‍कम भरल्याशिवाय त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले.

शुक्रवार (ता. ६) पर्यंत जिल्ह्यात ४० हजार ८५७ शेतकऱ्यांना २९६ कोटी ८५ लाखांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २२ टक्‍के कर्जवाटप झाल्याची माहिती त्यांनी दिली. दीड लाखांवरचे कर्ज भरायला सहा महिने लोटूनही कर्जमाफीचा व नव्याने कर्जवाटप मिळाले नसल्याची बाब या वेळी निदर्शनास आणून देण्यात आली. मुद्रा कर्ज मध्यस्थांशिवाय मिळत नाही. स्टॅंडअप इंडियात किती लोकांना आधार मिळाला याबाबत प्रश्‍नच असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष दानवे यांनी या वेळी केला.

सत्यशोधन आंदोलनानंतर जे आकडे समोर आले त्यानुसार अजूनही ५७ टक्‍के शेतकऱ्यांना कर्जमाफी व नव्याने कर्ज मिळण्याचा प्रश्‍न कायम आहे. सरकार जे दावे करत आहेत ते सगळे खोटे आहेत. अशाप्रकारचे सरकारच्या जवळपास ६५० योजनांसंबंधीच्या प्रत्येक घोषणांचे सत्यशोधन करून सत्य उजेडात आणले जाईल. अंबादास दानवे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना, औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com