राज्यात अंडीपुंज पुरवठा विस्कळित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : संपूर्ण राज्यात रेशीम कोष उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या अंडीपुंजचा पुरवठा अजूनही विस्कळितच आहे. अंडीपुंजाची वारंवार मागणी करूनही याविषयी कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने राज्यासह मराठवाड्यात रेशीम कोष उत्पादनाला खीळ बसल्याचे चित्र आहे.

राज्यात गतवर्षीपर्यंत ४० लाख अंडीपुंजांची गरज होती. त्यापैकी जवळपास १६ लाख अंडीपुंजांची निर्मिती गडहिंग्लज येथील अंडीपुंजनिर्मिती केंद्रात होत होती. यंदा विस्तारलेल्या तुती क्षेत्रामुळे अंडीपुंजांची गरज जवळपास ८० लाखांवर जाऊन पोचली. शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे वाढता कल पाहता ही मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. गडहिंग्लज येथील अंडीपुंजनिर्मिती केंद्राने क्षमतेच्या पुढे जाऊनही कामगिरी केल्यास अंडीपुंजांची निर्मिती २५ लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्‍यता नाही. शिवाय तेवढी अंडीपुंज उपलब्ध झाली तरी राज्याची गरज भागविण्यासाठी किमान ५५ लाख अंडीपुंजांची गरज आहे. त्यासाठी कर्नाटकवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही.

प्राप्त माहितीनुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा रेशीम कार्यालयाकडून बंगळूर अंडीपुंजीनिर्मिती केंद्राकडे गरजेनुसार मागणी केली आहे. तसेच बंगळूर येथील नॅशनल सिल्कवॉर्म सीड आॅर्गनायझेशन आणि केंद्रीय रेशीम मंडळाच्या अधिकाऱ्यांना मागणीबाबत वारंवार कळवले आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत अंडीपुंजांचा पुरवठा सुरळीत होईल असे कळविण्यात आले होते. परंतु आजपर्यंत पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

६ लाख ४३ हजारांची गरज मिळाले दीड लाख अंडीपुंज राज्यासह मराठवाड्यातून रेशीम कोष उत्पादनासाठी १ ते २६ नोव्हेंबरदरम्यान जवळपास ६ लाख ४३ हजार २०० अंडीपुंजांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यामध्ये औरंगाबाद विभागासाठी ४ लाख २० हजार ४००, पुणे विभागासाठी १ लाख २३ हजार २००, अमरावती विभागासाठी ८४ हजार ५०० तर नागपूर विभागासाठीच्या १५ हजार १०० अंडीपुंजांचा समावेश होता.

प्रत्यक्षात संपूर्ण राज्यात नॅशनल सिल्कवॉर्म सीड आॅर्गनायझेशन आणि केंद्रीय रेशीम मंडळाकडून केवळ १ लाख ५८ हजार ९०० अंडीपुंजांचा पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील ४५ हजार ५००, पुणे विभागातील ५४ हजार ६००, अमरावती विभागातील ५८ हजार ८०० अंडीपुंजांचा समावेश आहे. नागपूर विभागात मागणीच्या तुलनेत अंडीपुंजांचा पुरवठाच करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.   नऊ जिल्ह्यांत अंडीपुंज पुरवठा नाहीच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, पुणे विभागातील सांगली, कोल्हापूर, जळगाव तर नागपूर विभागातील वर्धा, भंडारा व नागपूर या ९ जिल्ह्यांत मागणीच्या तुलनेत अंडीपुंजांचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातून ४१ हजार, जालना जिल्ह्यातून १ लाख ५२ हजार २००, परभणीतून २० हजार, सांगलीतून  १० हजार, कोल्हापूर जिल्ह्यातून  ३ हजार, जळगाव जिल्ह्यातून १ हजार, नागपूर जिल्ह्यातून  ५ हजार १००, वर्धा जिल्ह्यातून ६ हजार, भंडारा जिल्ह्यातून ४ हजार अंडीपुंजांची मागणी नोंदविण्यात आली होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com