शेतीमुळे अर्थव्यवस्थेला झळाळी : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास

शेती क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रामुळे झळाळी मिळेल. उन्हाळी हंगामात वाढलेली पेरणी आणि चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे खरीप लागवडीत वाढ झाली आहे.
SHAKTIKANTA DAS
SHAKTIKANTA DAS

मुंबई: शेती क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रामुळे झळाळी मिळेल. उन्हाळी हंगामात वाढलेली पेरणी आणि चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे खरीप लागवडीत वाढ झाली आहे. आगामी काळात महागाई किती वाढेल याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. मात्र कृषी क्षेत्र आशेचा किरण आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी (ता.२२) स्पष्ट केले. दास यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो दर कमी करण्याबरोबर सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. त्या मुदतीत वाढ केली आहे. कोरोनाच्या संकट काळात रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे जाहीर केले. बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा आरबीआयने निर्धारित वेळापत्रकापूर्वी रेपो दराची घोषणा केली. ६ जून रोजी पतधोरण जाहीर होणार होते. मात्र त्याआधीच व्याजदर कपात करुन बँकेने सामान्य कर्जदारांना दिलासा दिला. याआधी मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. आता आणखी तीन महिने म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कर्जदारांची हप्त्यांमधून तात्पुरती सुटका होईल.

महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. मात्र, पुढील तीन महिने महागाई कायम राहणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत ही महागाई कमी होईल, असे शक्तीकांत दास यांनी यावेळी सांगितले.

कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले होते. यात विविध क्षेत्रांना २० लाख कोटींची मदत योजनांमधून केली होती. लॉकडाऊनमुळे वस्तूंचा खप कमी झाला आहे. आता विक्रीला चालना देण्याची गरज दास यांनी यावेळी व्यक्त केली. फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने जीडीपीच्या ३.२ टक्के निधी अर्थव्यवस्थेत उपलब्ध केला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभर उद्योगांची दिवाळखोरी आणि नादारी विधेयकातून सुटका केली असल्याचे त्यांनी सांगितले. निर्यात ३० वर्षातील निच्चांकी स्तरावर असल्याचे ते म्हणाले.  

गव्हर्नर दास म्हणाले....

  • अर्थव्यवस्थेला केवळ शेती क्षेत्राकडून दिलासा 
  • कृषी क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांना मोठा फटका 
  • देशात उन्हाळी भात, कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या पेरणीमध्ये चांगली प्रगती 
  • आतापर्यंत उन्हाळी लागवडीत ४३.५ टक्क्यांनी वाढ झाली 
  • २०१९-२० च्या रब्बी हंगामात बंपर उत्पादन 
  • सरकारकडून शेतमालाची विक्रमी खरेदी
  • रेपो दरात ०.४० टक्क्यांची कपात 
  • गृह, वाहन, औद्योगिक कर्जे स्वस्त होण्याची शक्यता 
  • तीन महिने कर्जदारांची हप्त्यांमधून तात्पुरती सुटका
  • पुढील तीन महिने महागाई कायम राहिल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com