सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा पूरस्थितीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अनेक भागांतील भातरोपे, ऊसशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग अजूनही पाण्याखाली असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. बांदा आणि खारेपाटणला पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १६) रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र सकाळी दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रभर जिल्ह्यात संततधार सुरू होती. त्यानंतर दिवसभर पाऊस सुरू होता. मंगळवारीदेखील मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाचा जोर अधिकच वाढला. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. तेरेखोल नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे बांदा शहराला पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. तर खारेपाटणमध्ये देखील पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे खारेपाटणला देखील पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
या भागातील चिंचवली, तिथवली या भागांतील कित्येक एकर ऊसशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातील पावशी (ता. कुडाळ) परिसरातील भातरोपे पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी पाऊस उघडीपदेखील देत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.