सिंधुदुर्गला पूर्वमोसमी पावसाने झोडपले

विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह बुधवारी (ता. २३) सायंकाळी जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला पूर्वमोसमी पावसाने झोडपले. कोकिसरे पालकरवाडीला वादळाचा तडाखा बसला. यामध्ये सहा ते सात घरांचे नुकसान झाले.
Sindhudurg was hit by pre-monsoon rains
Sindhudurg was hit by pre-monsoon rains

सिंधुदुर्गनगरी ः विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह बुधवारी (ता. २३) सायंकाळी जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला पूर्वमोसमी पावसाने झोडपले. कोकिसरे पालकरवाडीला वादळाचा तडाखा बसला. यामध्ये सहा ते सात घरांचे नुकसान झाले. पूर्वमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू, केळी आणि रब्बीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गेले तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण होते. तापमानात देखील वाढ झाली होती. दरम्यान, हवामान विभागाने चार दिवस पावसाचा अंदाज दिला होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेतीन वाजेनंतर पावसाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह सह्याद्री पट्ट्यातील काही गावांमध्ये पावसाला सुरुवात झाली. 

वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. खांबाळे, आर्चिणे, कोकिसरे या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. कोकिसरे पालकरवाडीला वादळाने जोरदार तडाखा दिला. यामध्ये लाखो रुपयांची हानी झाली आहे. यामध्ये श्रीराम वळंजू, मनोहर वळंजू, शांताराम पवार, संतोष पवार, शिवराम पवार, यांच्यासह अन्य काहींच्या घरांच्या छपराचे नुकसान झाले आहे. 

वैभववाडी पाठोपाठ कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांतील अनेक गावांना पूर्वमोसमीने झोडपून काढले. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, नांदगाव, कळसुली परिसरांत तब्बल अर्धा तास पावसाच्या सरी कोसळत होत्या. वाऱ्याचा वेग देखील वाढला होता. कणकवली शहराला देखील पावसाने वादळीवाऱ्यासह झोडपले यामध्ये संतोष मनोहर राणे या शेतकऱ्याने लागवड केलेल्या केळी, कलिंगड, कुळीथ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याशिवाय अन्य शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे कणकवली शहरातील काही घरांची छपरे उडाली आहेत. सावंतवाडी तालुक्याला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले. देवगड, मालवण तालुक्यांतील काही गावांमध्ये देखील पूर्वमोसमी पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. बांधकाम व्यावसायिकांची देखील चांगलीच तारांबळ उडाली.

पूर्वमोसमीचा पावसाचा सर्वाधिक फटका आंबा, काजूसह अन्य फळपिकांना बसला आहे. या वर्षी यापूर्वी आलेल्या अनेक नैसर्गिक संकटामुळे आंबा, काजूचे २० ते २५ टक्के उत्पादन मिळणार होते. त्यातच आज झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे उरल्यासुरलेल्या आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com