`साहेब, तुम्हीच सांगा आम्ही वर्षभर कसे जगायचे`

`साहेब, तुम्हीच सांगा आम्ही वर्षभर कसे जगायचे`
`साहेब, तुम्हीच सांगा आम्ही वर्षभर कसे जगायचे`

अकोला : ‘‘साहेब, माझ्याकडील ८ एकरांत सोयाबीन, कापूस, ज्वारी पेरली होती. सोयाबीनचा दाणा झाला नाही. ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले, चारा खराब झाला आणि कापसापासूनही काही मिळेल, असे दिसत नाही. तुम्हीच सांगा आम्ही वर्षभर कसे जगायचे, जनावरांना काय खाऊ घालायचे...’’ अकोला तालुक्यातील म्हैसपूर येथे केंद्राच्या पथकाने शनिवारी (ता. २३) सकाळी भेट दिली तेव्हा शेतकरी गजानन रामभाऊ अडकने या शेतकऱ्याने आपली कैफियत मांडली. 

अवेळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले असून नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पथकाने शनिवारी भेट दिली. अमरावती विभागात आलेल्या पथकाचे प्रमुख डॉ. आर. पी. सिंग, विभागीय आयुक्त पियुष सिंग, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी अकोला व बाळापूर तालुक्यांतील गावांमध्ये जाऊन पाहणी केली. 

जिल्ह्यातील नुकसान पाहणी दौऱ्याची सुरुवात अकोला तालुक्यातील म्हैसपूर येथून झाली. गजानन अडकने यांच्या शेतातील ज्वारी व कपाशी पिकांचे पूर्णत:  नुकसान झालेले असून पथक प्रमुखांनी त्या शेताची पाहणी केली. अडकने  यांनी ज्वारीचे पीक डॉ. सिंग यांना दाखवत कणसातून कोंब बाहेर आल्याचे तसेच आता जे पीक उभे दिसते त्या कणसातील ज्वारीवर बुरशी आल्याचे दाखवले. 

‘आता नुसता दौरा नको, मदत द्या’

नाशिक : साहेब, अतिवृष्टीमुळे आमचे अतोनात नुकसान झाले. हंगाम वाया गेला. आता महिना उलटला तरीदेखील मदत मिळालेली नाही. रब्बी हंगाम तोंडावर असताना आम्ही करायचं काय अन् जगायचं कसं? आता केंद्रीय पथकाचा नुसता दौरा नको तर मदत द्या़ अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी (ता.२२) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. केंद्रीय वित्तमंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ, शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाषचंद्र पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष पीक पाहणी केली. विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे, जिल्हा कृषी अधिक्षक संजीव पडवळ, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदीसह कृषी विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

निफाड तालुक्‍यातील पाचोरे वणी येथील बाळू वाटपाडे यांच्या मका पिकाची पाहणी, भास्कर वाटपाडे यांचे सोयाबीन पिकाची तर बाजीराव गंगाधर यांचे द्राक्षाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर खडक मालेगाव येथील ज्ञानेश्वर शिंदे यांचे मिरची व द्राक्षे, रंगनाथ शिंदे यांचे सोयाबीन व मका, रंगनाथ पोपट शिंदे यांच्या ज्वारी व बाजरी पिकांची पाहणी केली. दहेगाव येथील अण्णा कनोर व धर्मा कनोर यांच्या कांदा पिकाची तर चांदवड तालुक्यातील निमोण गावातील मनोज ललवाणी व पंढरीनाथ देवरे यांचे कांदा पिकाची तर शंकर गांगुर्डे यांच्या द्राक्ष बागांची पाहणी करून पंचनाम्याची तपासणी केली.  

मालेगाव तालुक्‍यातील चौंडी येथील अशोक सरोदे यांचे भुईमुग, लक्ष्मण सरोदे यांचे कांदा व डाळींब पिकाची पाहणी तर वऱ्हाणे गावातील रमेश पवार यांचे कांदा पिकाची तर भाऊसाहेब अहिरे यांचे मका पिकाची पाहणी केली. मात्र, हे पथक नुकसान झाल्यानंतर एक महिन्यानंतर आल्याने शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला. नुकसानीची माहिती सरकार दरबारी पोचली अन् मदत देखील जाहीर झाली पण शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, अशी तक्रार या पथकाकडे केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com