तिवरे दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी

तिवरे धरण
तिवरे धरण

मुंबई: चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ विकास सिंचन महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे पथकाचे प्रमुख आहेत. पथकाला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. २ जुलै रोजी तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना झाली होती. दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता तर १० जण बेपत्ता झाले होते. चार दिवसानंतर मृतांचा आकडा २० वर पोचला आहे. या घटनेप्रकरणी विरोधी पक्षाने संबंधित जबाबदार अधिकारी तसेच धरणाचे बांधकाम करणाऱ्या शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाईल, असे घोषित केले होते. त्यानुसार मृद आणि जलसंधारण विभागाने शनिवारी या संदर्भातील  शासन निर्णय जारी केला. चौकशी समितीत मुख्य अभियंता (लघुसिंचन) जलसंधारण, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा समावेश आहे. तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे आणि त्यानुसार आनुषंगिक चौकशी करणे, लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, गावतलाव, मालगुजारी तलाव आणि इतर तत्सम तलावांच्या बाबतीत भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना सुचविणे, अशी कार्यकक्षा समितीला आखून दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com