मुंबई बाजार समितीत पोलिसांच्या मदतीने ‘सोशल डिस्टन्स’ 

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारातील खरेदीदारांच्या गर्दीवर समिती प्रशासनाने पोलिसांची मदत घेत नियंत्रण मिळवले आहे.
मुंबई बाजार समितीत पोलिसांच्या मदतीने ‘सोशल डिस्टन्स’ 
मुंबई बाजार समितीत पोलिसांच्या मदतीने ‘सोशल डिस्टन्स’ 

मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारातील खरेदीदारांच्या गर्दीवर समिती प्रशासनाने पोलिसांची मदत घेत नियंत्रण मिळवले आहे. बाजार आवारात विशिष्ट अंतरानेच खरेदीदारांना प्रवेश दिला जात असून भाजीपाल्याच्या आवकेवर मर्यादा घालण्यात आली आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज २५ ते ३० हजार नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे करोना संसार्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत संचारबंदीच्या काळात व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र यामुळे जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेत शासनाने भाजी व धान्य बाजार सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. इच्छा नसतानाही व्यापाऱ्यांनी बाजार सुरू केला होता. मात्र खरेदीदारांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याने त्यांची चिंता वाढली होती. 

विशेषत: भाजीपाला बाजारात जास्त गर्दी होत होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खारघर येथे हा बाजार तात्पुरता स्थलांतरित करण्याचे नियोजन सुरु आहे. मात्र आता एपीएमसी प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचे चित्र आहे. बाजारात सामाजिक अंतर ठेवून तसेच प्रवेशद्वारावर वाहनांचे निर्जंतुकीकरण करुन बाजार सुरू करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांकडून किती माल मागवला, वाहनाचा नंबर ही सर्व माहिती घेत ती पोलिसांना देण्यात येत आहे. त्यानुसार परवानगी मिळालेल्याच वाहनांना पोलिसांनी प्रवेश दिला. 

सोमवारी बाजारात दोनशे ते अडीचशे गाड्यांचीच आवक झाली होती. परंतु प्रशासनाने परवानगी दिलेल्या ६० वाहनांनाच बाजारात प्रवेश दिला. उर्वरित १८० ते २०० वाहने परस्पर मुंबईत पाठवून दिल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच केवळ दोन प्रवेशद्वारेच खुली ठेवण्यात आली होती. 

प्रत्येक वाहनांवर जंतुनाशक फवारणी करण्यात येत होती. खरेदीदाराला हात स्वच्छ धुण्यास सांगितले जात होते. सामासिक अंतर ठेवण्यासाठी लाकडी अडथळे लावण्यात आले होते. यामध्ये विशिष्ट अंतरावर एका रांगेत खरेदीदारांना सोडले जात होते. बाजारात ही शिस्त ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. 

बाजार स्थलांतरास व्यापाऱ्यांचा विरोध  भाजीपाला बाजारातील दोन दिवसांच्या गोंधळाने भाजीपाला व्यापार सुरक्षितेच्या दृष्टीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खारघर येथे स्थलांतराचे नियोजन कोकण विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र खारघर हे व्यापारी व खरेदीदार यांना दळणवळणासाठी लांब पडणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी व्यापारी खारघर येथे स्थलांतर होण्यास इच्छूक नाहीत. या स्थलांतराबाबत शासनाच्या बैठकीत निर्णय होईल, असे मत भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com