सोलापूर ः खते-बियाणे पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन खरीप हंगामाकडून कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. शिवाय माॅन्सूनही येत्या दोन दिवसांत पोहोचण्याची स्थिती तयार झाली असताना, सर्वाधिक महत्त्वाच्या अशा शेतकऱ्यांच्या आर्थिक भांडवलाचा प्रश्न मात्र अद्याप सुटू शकलेला नाही. या हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात अद्यापही धिमी गती आहे. तसेच अनेक बँकांनी तर अजून सुरुवातच केली नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
कोरोनामुळे आधीच केवळ बाजारपेठेपर्यंत पोचू शकली नसल्याने हातची पिके गेली आहेत. आता नव्याने सुरुवात करायची म्हटलं तर भांडवलाची गरज आहे. पण बँका फारशा सहकार्याच्या भूमिकेत नाहीत. जिल्ह्यात खरिपाचे यंदाचे उद्दिष्ट २ लाख ७३ हजार हेक्टर इतके आहे. जिल्हा अग्रणी बँकेने त्यासाठी सर्वच बँकांना पीककर्ज वेळेत आणि तातडीने पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. काही बँका अगदी गावस्तरापर्यंत नियोजन करुन ते वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक बँकांनी याबाबत काहीच हालचाल केल्याचे दिसत नाही.
जिल्ह्याला पीककर्जासाठी यंदा १४३८ कोटी ४१ लाख रुपये इतके उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ ११६ कोटी १० लाख रुपये म्हणजे अगदीच किरकोळ वाटप केले आहे. आजही जवळपास १३०० कोटीहून अधिक कर्जवाटप शिल्लक आहे. पण बँक अधिकारी त्याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते. पण यामध्ये शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनीच यात लक्ष घालून बँकांकडून वेळेत आणि तातडीने कर्ज वाटप कसे होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.