जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते ६ ऑगस्टला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८`चा प्रारंभ झाला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे करण्याचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, सर्व जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख यांची संयुक्त मोहीम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणांचे निरीक्षण केंद्र सरकारने निवडलेल्या सर्वेक्षण संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायती, प्रार्थनास्थळे, बाजाराची ठिकाणे आणि इतर महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश असणार आहे. गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, आग्रही ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ती, आशासेविका आणि शिक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या समूहासमोर चर्चा करून तसेच निरीक्षणाद्वारे आणि संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीचे एकत्रित संकलन संस्थेकडून करण्यात येणार आहे.