पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालय

राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची कामे करावीत; मात्र ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे.
sowing
sowing

पुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची कामे करावीत; मात्र ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. त्यामुळे सोयाबीन, तूर ,भुईमूग, मका पिकासाठी पेरणीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारीची कामे करावीत, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या भात रोपवाटिकांची पूर्वतयारी चालू ठेवावी. कापूस व सोयाबीन उत्पादकांनी जमिनीच्या प्रकारानुसार पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका पिकासाठी नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात १४ जूनपर्यंत सरासरी ९६ टक्के पाऊस होत असतो. मात्र, यंदा तो १२० टक्के झालेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ११७ टक्के पाऊस झाला होता. कोकण, औरंगाबाद, अमरावती विभागात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. अर्थात, पुणे विभागात ७५ टक्के तर नाशिक विभागात ४६ टक्के तर नागपूर विभागात आतापर्यंत झालेला पाऊस ८६ टक्के आहे. 

शेतकऱ्यांनी कोल्हापूर विभागात १२ हजार हेक्टरवर खरीप पेरा केलेला आहे. यात धानाचा ९ हजार हेक्टरपेक्षा जास्त धूळपेरा केला आहे. दोन हजार हेक्टरवर सोयाबीनचाही पेरा झालेला आहे. मका, तूर, मूग, उडीद, ज्वारी अशा पिकांच्या ५०० हेक्टरपेक्षा पेरा गेल्या आठवड्यात झालेला होता. 

शेतकऱ्यांनी पुरेसा म्हणजेच किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्लाही विविध जिल्ह्यांमधील कृषी कार्यालयांकडून दिला जातो आहे. कारण, अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. पुरेसा पाऊस झाल्यास खंड पडला तरी पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

उन्हाळी लागवड दुप्पट  राज्यात यंदा उन्हाळी हंगामातील पेरा २०० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. उन्हाळी पिकांचा पेरा सरासरी पावणे दोन लाखाच्या आसपास होत असतो. यंदा हाच पेरा गेल्या आठवडयापर्यंत चार लाख हेक्टरच्या पुढे गेला होता. यात उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल, ज्वारी,बाजरी, मका पिकाचा समावेश होता. सध्या या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com