पुणे ः सरकारच्या निर्णयामुळे कडधान्यांचे दर दबावात असल्याने रब्बी पेरणी वाढूनही कडधान्य पेरा माघारला आहे. तर चालू हंगामातील तेजीमुळे मोहरीची विक्रमी पेरणी झाली आहे. यंदा रब्बीचे उत्पादनही विक्रमी पातळीवर असेल, असा विश्वास असे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव शुधांशू पांडे यांनी व्यक्त केला आहे. २०२१मध्ये सरकारने शेतीमालातील तेजी कमी करण्यासाठी आयातीला परवानगी, मुक्त आयातीचे धोरण आणि आयात शुल्कात कपात केली. या धोरणांचा सर्वाधिक फटका कडधान्याला बसला. शेतकऱ्यांना खरिपातील महत्त्वाच्या मूग आणि उडदाचे दर हमीभावापेक्षा कमीच मिळाले. तर तर आता तुरीचीही आवक सुरू झाली असून, दर दबावात आहेत. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांनी रब्बीत कडधान्याची पेरणी काहीशी कमी केली. रब्बीत शेतकऱ्यांनी तेलबियांखालील क्षेत्र वाढविले आहे. यातही चालू हंगामात दर चांगले मिळत अरल्याने शेतकऱ्यांनी मोहरीला पसंती दिली आहे. तर यंदा उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्रही वाढले आहे. उन्हाळी सोयाबीनची सर्वाधिक लागवड यंदा महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात जवळपास दोन लाख हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन असेल, असे जाणकारांनी सांगितले. तर सोयाबीनचे उन्हाळी उत्पादन ८ ते १० लाख टनांपर्यंत पोहोचू शकते, असे व्यापारी आणि प्रक्रियादारांनी सांगितले. यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीचा विचार करता यंदा रब्बी पेरणी दीड टक्क्याने वाढली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ३१) देशातील रब्बीचा पेरा ६३४.६८ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली. रब्बीत यंदा गव्हाच्या पेरणीतही एक टक्क्यापर्यंत कमी होऊन ३२५.८८ लाख हेक्टरवर झाली आहे. तर तेलबिया खालील क्षेत्र यंदा २०.४ टक्क्यांनी वाढले आहे. तेलबिया पिकांची पेरणी ९७ लाख हेक्टरवर झाली आहे.
मोहरीची विक्रमी लागवड मोहरीला चालू हंगामात विक्रमी दर मिळत आहे. त्यातच कडधान्याचे दर दबावात असल्याने उत्तरेतील शेतकऱ्यांनी मोहरीला पसंती दिली आहे. यंदा मोहरीचा पेरा २२.५ टक्क्यांनी वाढून ८८.५४ लाख हेक्टरवर पोहोचला आहे. देशातील खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी मोहरीचे उत्पादन वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या हंगामात मोहरीचे १०१ लाख टन उत्पादन झाल होते. तर यंदा १२२.४ लाख टन मोहरी उत्पादनाचे सरकराने उद्दिष्ट ठेवले आहे. मोहरी उत्पादक राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियानात क्षेत्र वाढल्याचे येतील कृषी विभागांनी सांगितले आहे.
प्रतिक्रिया रब्बीत शेतकऱ्यांनी मोहरी पिकाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांत मोहरीचे अधिक उत्पादन हाती मिळेल, अशी अपेक्षा आपण करु शकतो. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचे आपल्याला दिसेल. - शुधांशू पांडे, सचिव, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग रब्बीत झालेली पेरणी (लाख हेक्टरमध्ये) पीक…२०२१-२२… गहू…३२५ भात…१४ हरभऱा…१०७ मसूर…१७…
उडीद…६ कडधान्य…१५२ ज्वारी…२३ मका…१५ बार्ली…७ एकूण भरडधान्य….४५ मोहरी…८८ तेलबिया…९७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.