येवल्यात पेरण्या पूर्ण; पावसाची मात्र दांडी

येवल्यात पेरण्या पूर्ण; पावसाची मात्र दांडी
येवल्यात पेरण्या पूर्ण; पावसाची मात्र दांडी

येवला, जि. नाशिक  : यंदाच्या खरीप हंगामात येवला तालुक्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने उगवलेल्या पिकांवर पाण्याअभावी विपरित परिणाम होत आहे. यंदाच्या हंगामात मका पेरणी सर्वाधिक असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यातील मूग व सोयाबीनचे क्षेत्रही वाढले आहे.

जमिनीतील ओल आणि पुढच्या पावसावर नजर ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. माॅन्सूनपूर्व रोहिणीनंतर मृगाने संपता संपता, तर त्यानंतरच्या आर्द्राच्या आलेल्या पावसावर पेरणीची सुरवात झाली. येवला तालुक्याचे खरीप हंगामासाठीचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ५४ हजार २३३ हेक्टर आहे. त्यापैकी ५४ हजार १०५ हेक्टर क्षेत्रात आजवर खरीप पेरणी झाली आहे. मक्यानंतर तालुक्यात कपाशीची अधिक लागवड झाली आहे.

यंदा तालुक्यात कपाशीचे क्षेत्र घटल्याचे स्पष्ट दिसत आहे. गतवर्षीचा बोंड अळीचा फेरा, त्यातून घटलेले एकरी उत्पादन, याचा हा परिणाम मानला जात आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन, मूग, भुईमूग, तूर, उडीद या खरीप पिकांची त्यांच्यासाठीच्या सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाल्याचे दिसत आहे. बाजरीची पेरणी निम्म्याने घटली आहे. मक्याचे उत्पादन लवकर हाती येते. पुढील कांदा लागवडीसाठी रान लवकर मोकळे होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी मका पेरणीस प्राधान्य दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उगवणीच्या वाटेवर असलेल्या पिकांची वाढ होत नसल्याचे चित्र आहे. पावसाचे दमदार आगमन लवकर झाले तरच शेतकऱ्यांसमोर उभे ठाकलेले दुबार पेरणीचे संकट दूर होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com