सोयाबीन आणि कपाशीसाठी मुरवणीचा पाऊस पोषक

सोयाबीन आणि कपाशीसाठी मुरवणीचा पाऊस पोषक
सोयाबीन आणि कपाशीसाठी मुरवणीचा पाऊस पोषक

पुणे ः पावसाअभावी दुबार-तिबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना गेले दोन दिवस पावसाच्या पुनरागमनामुळे दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. खानदेश, विदर्भात सर्वदूर मुरवणीचा पाऊस होत असल्याने तो कोरडवाहू कपाशी आणि सोयाबीन पिकांसाठी पोषक ठरला आहे. बाजरीलाही या पावसाचा फायदा होणार आहे; पण मका, बाजरीला आणखी पावसाची गरज आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सातत्याने वातावरणात होत असलेला बदल आणि पावसाचा अनियमितपणा यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.   नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाने टंचाई क्षेत्रातील पिकांना दिलासा मिळाला; मात्र सततच्या पावसाने पिकांची स्थिती आता अधिकच बिकट बनली असल्याचे चित्र द्राक्ष शिवारात दिसते आहे.  परभणी जिल्ह्यात प्रदीर्घ खंडानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असेलल्या पावसामुळे सुकू लागेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे; परंतु पिकांत पाणी साचून राहिल्यामुळे तसेच झडीमुळे काढणीस आलेल्या मुगाच्या शेंगाना मोड फुटत आहेत. आधी अवर्षणामुळे मूग मोडून टाकावा लागला आणि आता अतिवृष्टीमुळे काढणीस आलेले मुगाचे पीक हाती लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे उत्पादनात यंदा मोठी घट येणार आहे. सातारा जिल्ह्यात आले, ऊस, भात, भुईमूग या पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. सर्वाधिक प्रादुर्भाव आले पिकावर दिसून आला आहे.  विदर्भात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती; परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस सोयाबीन, मूग, कापूस या पिकांसाठी पोषक ठरला आहे. नगर जिल्ह्यात ४० दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाला; मात्र या पावसाचा त्या पिकांना फारसा फायदा झाला नसल्याचे दिसत आहे. सव्वा महिना पाऊस नसल्याने खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुगाची पिके जागेवरच करपली आहेत. कापूस, तुरीची वाढ खुंटल्याने सुमारे अडीच लाख हेक्‍टरवरील पिके वाया गेलेली आहेत. सोलापूर जिल्ह्यात तब्बल अडीच महिन्यांनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. खरीप पिके यापूर्वीच हातातून गेल्याने या पावसाचा कोणताही फायदा खरीप पिकांना होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पाऊस झाला नसता तर १० ते २० टक्‍के नुकसानीत भर पडली असती. सोयाबीन, मुगामध्ये शेंगा भरण्याला अडचणीचे ठरले असते. तरीसुद्धा उशिरा पेरलेल्या पिकांचे २० ते २५ टक्‍के नुकसान संभवते. तसेच पावसाअभावी रब्बी धोक्‍यात येण्याची शक्‍यता होती. तापमानात वाढ झाल्यास कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्‍यता असल्याचे जाणकार, तज्ज्ञांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com