सोयाबीन बियाणे विक्रीपूर्वी उगवण चाचणी आवश्‍यक; पुन्हा संघर्षाची चिन्हे

यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे विक्री करण्यापूर्वी संबंधित कंपनी व लॉटनिहाय उगवणक्षमता चाचणी घेऊन नोंदी ठेवण्याबाबत सुचविण्यात आले आहे. हा प्रकार सोईस्कर नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
सोयाबीन बियाणे विक्रीपूर्वी उगवण चाचणी आवश्‍यक; पुन्हा संघर्षाची चिन्हे
सोयाबीन बियाणे विक्रीपूर्वी उगवण चाचणी आवश्‍यक; पुन्हा संघर्षाची चिन्हे

अकोला ः गेल्या वर्षात सोयाबीन बियाणे उगवणीवरून झालेल्या तक्रारी पाहता यंदा कृषी खात्याने हंगामाच्या सुरुवातीपासूनच खबरदारी घेणे सुरू केले आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे विक्री करण्यापूर्वी संबंधित कंपनी व लॉटनिहाय उगवणक्षमता चाचणी घेऊन नोंदी ठेवण्याबाबत सुचविण्यात आले आहे. हा प्रकार सोईस्कर नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. निर्णय प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणणे शक्य नसल्याने त्याविरुद्ध येत्या काळात राज्यभर आवाज उठण्याची परिस्थिती तयार होऊ लागली आहे.  राज्यात खरिपात सोयाबीनचे सर्वाधिक ४२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या हंगामात सोयाबीनला चांगले  दर मिळाल्याने यात आणखी वाढ होऊ शकते. हंगामात सोयाबीन बियाण्याचा पुरवठा विविध खासगी कंपन्यांसह महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून केला जातो.

शेतकरी स्वतःकडील बियाण्याचाही मोठा वापर करीत असतात. मात्र प्रामुख्याने खासगी कंपन्यांच्या बियाण्याची लाखो क्विंटल विक्री होत असते. गेल्या वर्षी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत तक्रारी झाल्या होत्या. यात ‘महाबीज’सह प्रामुख्याने मध्य प्रदेशातील खासगी कंपन्यांनी पुरविलेल्या बियाण्याचा समावेश होता. 

शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींना अनुसरून विक्रेत्यांना जबाबदार धरीत गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही कृषी विभागाने केली होती. याविरुद्ध विक्रेत्यांच्या ‘माफदा’ संघटनेकडून तीन दिवसांचा राज्यव्यापी बंदही पाळण्यात आला. शिवाय या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून विक्रेत्यावर गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही स्थगित करणेबाबतचा आदेश मान्य करून घेतला होता. दुसरीकडे आलेल्या तक्रारींची खातरजमा करताना कृषी विभागाची एकच दमछाक झाली होती. तर बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीलाही सामोरे जावे लागले. अनेकांना या नुकसानाची रुपयाही भरपाई मिळालेली नाही. 

या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या हंगामाला सामोरे जात असताना कृषी विभागाने प्रत्येक विक्रेत्याला कंपनीनिहाय व लॉटनिहाय विक्री होणाऱ्या सोयाबीन बियाण्याची विक्रीपूर्व उगवणक्षमता चाचणी घेण्याची तसेच त्याच्या  नोंदी ठेवण्याची सूचना केली आहे. याला विभागीय कृषी सहसंचालक तसेच वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचा संदर्भ देण्यात आला. सोयाबीन बियाण्याची ७० टक्क्यांवर उगवणशक्ती असेल तरच ते विकावे असे सुचविण्यात आले आहे. मात्र अशा प्रकारच्या चाचण्या व त्यांच्या नोंदी घेणे विक्रेत्यांना शक्य नसल्याची वस्तुस्थिती ते मांडत आहेत. विक्रेत्यांकडे सर्टिफाईड तसेच ट्रुथफूल बियाणे येत असते. हंगामात होणारी गर्दी पाहता तसेच एकाच दिवशी बियाणे पुरवठा होत नसल्याने चाचण्या करणे व विक्री करणे जुळणारी बाब नसल्याचे सांगितले जाते.   पुन्हा संघर्षाची चिन्हे कृषी विभागाचा हा निर्णय विक्रेत्यांसाठी सोयीचा नसल्याने त्याविरुद्ध जिल्ह्यापासून गावापर्यंत सर्वच स्तरांवरील विक्रेते विरोध व्यक्त करू लागले आहेत. काही जण सोयाबीन बियाणेच विक्री न करण्याच्या भूमिकेत आहेत. या संदर्भात विक्रेत्यांच्या तालुका, जिल्हा संघटनांचे मत एकत्रित करून ३० मार्चनंतर एकत्रित धोरणात्मक निर्णयाची तयारी केली जात आहे. ‘माफदा’ संघटना विक्रेत्यांचे हे विचार कृषी विभागाला कळविणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com