परभणी : मराठवाड्यामध्ये यंदा दुष्काळी स्थितीमुळे खरिप पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट आली आहे. अशातच काढणी हंगामापूर्वीच पाऊस गायब झाला. पावसात भिजल्याने होणारे बियाणे नापासाचे प्रमाण कमी झाले, उगवणशक्ती वाढली, परिणामी यंदा महाबिजच्या सोयाबीनच्या बीजोत्पादनात वाढ झाली आहे.
परभणी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे ४ लाख ३४ हजार ८२२ क्विंटल बीजोत्पादन झाले आहे. तर खरिप पिकांचे एकूण ४ लाख ३६ हजार ६९२ क्विंटल बीजोत्पादन झाले. गतवर्षी सोयाबीनचे २ लाख ३५ हजार क्विंटल बीजोत्पादन झाले होते.
महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र बियाणे उत्पादक महामंडळ (महाबीज)च्या परभणी विभागाअंतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांममध्ये २०१८-१९ च्या खरिप हंगामात पायाभूत आणि प्रमाणित बियाणाचा मिळून एकूण ३१ हजार ५ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट होते. त्यापासून ३ लाख ७१ हजार ५८२ क्विंटल बीजोत्पादन अपेक्षित होते.
परंतु यंदा प्रत्यक्षात ११ हजार ४१४ शेतक-यांनी २९ हजार ७१६ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रमासाठी पेरणी करून नोंदणी केली. त्यापैकी १० हजार ५१० शेतक-यांकडे २८ हजार २१ हेक्टरवरील बीजोत्पादन पिके उभी होती. त्यापासून ४ लाख ५२ हजार ४५१ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित होते. याच विभागात सोयाबीनकरिता १० हजार १६२ शेतक-यांनी २७ हजार ३३३ हेक्टरमधून ४ लाख ४७ हजार २८२ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित होते.
यंदा खरिपाच्या पेरणीनंतर अनेकदा पावसाचे खंड पडले. सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात सोयाबीनच्या काढणी हंगामापूर्वीच पाऊस गायब झाला. त्यामुळे पावसात भिजल्यामुळे होणारे सोयाबीन बियाणाचे नुकसान कमी झाले. लातूर, उस्मानाबाद सह अन्य काही जिल्ह्यांत सोयाबीनच्या कापणीनंतर गंजी लावून ठेवली जाते.
सोयाबीन गंजीमध्ये राहिल्यामुळे बुरशीची वाढ होऊन बियाणाची प्रत खराब होते. गतवर्षी ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या पावसात दाणे भिजल्यामुळे उगवण शक्ती ५० ते ५५ टक्के होती, त्यामुळे नापास बियाणाचे अधिक होते. यामुळे २ लाख ३५ हजार क्विंटल बियाणे उत्पादन मिळाले होते. यंदा पावसाअभावी रब्बी पेरणी करता आली नाही, त्यामुळे गंजी न लावता सोयाबीनची काढणी करण्यात आली.
पावसात न भिजल्यामुळे उगवणशक्ती ७० टक्के पेक्षा अधिक आहे. यंदा ७ हजार ८५१ शेतक-यांचे ४ लाख ३४ हजार ८२२ क्विंटल सोयाबीनचे बियाणे प्राप्त झाले आहे. अन्य पिकांमध्ये मूग ७१६ क्विंटल, उडिद ८२३ क्विंटल, ज्युट २२४ क्विंटल बियाणांचा समावेश आहे. खरिपातील सोयाबीन, मूग, उडिद, तूर, ज्युट, कापूस मिळून एकूण ८ हजार ५ शेतक-यांचे ४ लाख ३६ हजार ६९२ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे.
यंदा अपु-या पावसाअभावी उत्पादकता कमी झाली. परंतु, काढणीच्या वेळी पावसात न भिजल्यामुळे सोयाबीनचे बियाणाची उगवणशक्ती वाढली. नापास बियाणाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे बीजोत्पादनात वाढ झाली. - एस. पी. गायकवाड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, परभणी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.