लातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या लातूर बाजारपेठेत तीनशे रुपयांनी सोबायीनच्या दरात घसरण झाली आहे. एकीकडे सणासुदीत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने केला असला, तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसला आहे.
येथील बाजारपेठेत तर सोयाबीनची दररोज २५ ते ३० हजार क्विंटलची आवक होत आहे. गेल्या वर्षी कधी नव्हे ते सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. चालू हंगामात सोयाबीनला सात ते आठ हजार रुपये भाव राहील, असे शेतकऱ्यांना वाटत होते. पण काढणी हंगाम सुरुवात होण्यापूर्वी केंद्र सरकारने त्या वेळी घेतलेल्या अशाच एका निर्णयामुळे बाजार पेठेत प्रांरभीपासून भाव कमी झाले आहेत. गेली काही दिवस साडेचार हजार ते सहा हजारांच्या घरात भाव राहिले आहेत. त्यात केंद्र शासन वेगवेगळे निर्णय घेत असल्याने त्याचा फटका भावावर होत आहे. खाद्य तेलावरील आयात रद्द करण्याचा निर्णय होताच गुरुवारी (ता. १४) येथील बाजारपेठेत सोयाबीनचा भाव तीनशे रुपयांनी कोसळला. ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसताना दिसत आहे.
सोयाबीनचे मागील तीन दिवसांतील दर... | |||
तारीख | कमाल दर | किमान दर | सरासरी दर |
१४ आॅक्टोबर | ५५२६ | ४४०० | ५३४० |
१३ आॅक्टोबर | ५८०२ | ५८०० | ५६६० |
१२ आॅक्टोबर | ५६५२ | ४४०० | ५४५० |
कच्च्या खाद्य तेलावरील आयात रद्द करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. यात तेलाचे भाव कमी होऊन ग्राहकांना फायदा होईल. पण त्याचबरोबर सोयाबीनच्या भावावर परिणाम झाला आहे. एकाच दिवसात अडीचशे ते तीनशे रुपयांनी भाव घसरले आहेत. यात शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे. - ललीतभाई शहा, सभापती, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.