सोयाबीन
सोयाबीन

सोयाबीन वधारण्याची चिन्हे

पुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले तरी हा कल तात्पुरता असून, येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. मध्य प्रदेशात भावांतर योजनेमुळे सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने महाराष्ट्रात दरात घसरण झाली आहे. परंतु, सोयापेंडच्या मागणीतील वाढ, निर्यातीसाठीची मागणी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुकूल घडामोडी यामुळे येत्या काळात सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला प्रति क्विंटल ३३९९ रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली. परंतु सध्या राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याची तरतूद असलेली भावांतर भुगतान योजना यंदाही राबविण्यास सुरवात केली. त्यामुळे तिथे आवक प्रचंड वाढून भाव कोसळले. त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे.  चीनने सोयाबीन आणि मोहरी पेंडेवर घातलेली बंदी उठवावी, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून जोरदार पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच इराणने भारताकडून वस्तुविनिमय पद्धतीनुसार तेलाच्या बदल्यात सोयापेंड, साखर, तांदूळ आदी शेतमालाची खरेदी करण्याचे मान्य केले आहे.  यंदा मराठवाडा-विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने ताण दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असली तरी अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाच्या गरजेइतका पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट अपेक्षित नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील सोयाबीन उत्पादनात १३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात ४३.८८ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता १० टक्के वाढल्याचे दिसून येते. यंदा पीक चांगले असले तरी सोयापेंडची मागणी व निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असल्याने दरात पडझड होण्याची शक्यता नाही, असे असे शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री म्हणाले. दरम्यान, राज्य सरकार ‘नाफेड''च्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसंदर्भात दिरंगाई करत असून तातडीने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली. विक्रीची घाई नको आगामी काळात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आता कमी दरात सोयाबीन विक्रीची घाई करू नये, सोयाबीनचे दर किमान ३६०० रुपये होईपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहावी, असा जाणकारांचा सल्ला आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी मालाची साठवणूक करून ठेवावी किंवा शेतमाल तारण योजनेत गोदामांत माल ठेवावा, असे त्यांनी सांगितले. सकारात्मक संकेत सोयापेंडचे सध्याचे दर पाहता निर्यातीसाठी पडतळ (पॅरिटी) मिळत आहे. त्यामुळे निर्यातीसाठीचे चित्र आश्वासक आहे. तसेच पोल्ट्री उद्योगाकडूनही मागणीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. चीन आणि इराण या देशांबरोबर झालेल्या चर्चेमधूनही सोयाबीनसाठी सकारात्मक संकेत मिळाले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com