महाबीजचे सोयाबीन बियाणे यंदा महागले 

शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते महागली आहेत. मागील हंगामात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात होता. मात्र एव्हढे होऊनही सोयाबीन बियाण्याचा दर वाढविणे चुकीचे ठरलेले आहे. ही दरवाढ तातडीने मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला जावा. - प्रशांत डिक्कर, विदर्भ अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी
soybean
soybean

अकोला ः खरिपात झालेल्या पावसामुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती. याची झळ आता आगामी हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना झेलावी लागत आहे. सोयाबीनचे बियाणे क्विंटलला एक हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे. प्रामुख्याने महाबीजच्या बियाण्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोयाबीनची ३० किलोची एक बॅग मागील हंगामात १८९० रुपयांपर्यंत विकली जात होती. यंदा या बॅगची किमत ३६० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ केल्याची बाब यामागे सांगितली जात आहे. 

राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे. राज्यात जवळपास ३९ लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे. यासाठी लाखो क्विंटल बियाण्याची गरज लागते. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची गरज नसली तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे बियाणे ३० ते ४० टक्क्यांदरम्यान नव्याने खरेदी होत असते. यामुळे हंगामात दरवर्षी लाखो क्विंटल सोयाबीनची विक्री होते. या बियाणे पुरवठ्यात प्रामुख्याने महाबीजचा वाटा मोठा असतो.  हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली. असाच फटका बिजोत्पादनालाही बसला. बियाणे कंपन्यांना हंगामासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. साहजिकच उत्पादन खर्चात यंदा वाढ झाली. यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ करीत शेतकऱ्यांना झळ पोचविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाबीज बियाण्याच्या ३० किलो वजनाची बॅग ३६० रुपयांनी यंदा महागली आहे. मागील हंगामात १८९० रुपयांना मिळणारी ही बॅग आता २२५० रुपयांपर्यंत पोचली आहे. यंदा किलोला ७५ रुपयांचा दर चुकवावा लागणार आहे. तर काही खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रतिबॅग २४०० रुपये किंवा त्यापेक्षा अधि दराने विक्री केली जात आहे.  बियाणे कंपन्यांनी यंदा विक्री दर अनेक दिवसांपर्यंत जाहीर न केल्याने बाजारात गोंधळाची स्थिती बनली होती. महाबीजचे दर अद्यापही ग्रामीण भागात स्पष्टपणे जाहीर झालेले नसल्याने विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. आगामी खरीप हंगाम दारापर्यंत आला आहे. बियाणे विक्रीने गती घेतली आहे. मागील हंगामात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्याला यावेळी वाजवी दरात बियाणे उपलब्ध करून देणे गरजेचे असताना बियाणे दरवाढ ही आर्थिक झळ पोचविणारी मानली जात आहे. सरकारने यंदाच्या परिस्थितीचे भान ठेवून ही सोयाबीन बियाण्यांची अवास्तव भाववाढ मागे घेण्याची मागणी केली जात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com