पांगरी, जि. सोलापूर ः परिसरात गेल्या बारा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणाबरोबर रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून सोयाबीन पिवळे पडले आहे. याबरोबरच उडीद, मूग पिकासह कांदा रोपाचे आतोनात नुकसान झाले आहे.
अल्पवधीतील पीक म्हणून उडीद व मुग पिकांची सर्रास शेतकरी पेरणी करतात. मात्र सततच्या पावसामुळे मूग पीक हातातून गेले आहे. सोयाबीनला शेवटच्या टप्प्यात फटका बसणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. परिसरात यावर्षी सुरूवातीस चांगला पाऊस झाला. जून महिन्याच्या मध्यंतरी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांची मोठ्याप्रमाणात पेरणी करण्यात आली. सध्या पावसामुळे शेतातील कामे पूर्णपणे ठप्प आहेत.
सध्या मुगाच्या शेंगा तोडण्याचा कालवधी असून पहिल्या टप्प्यात शेंगाची तोडणी करून त्यानंतर पिकाची पूर्णपणे काढणी केली जाते. मात्र सततच्या पावसामुळे शेतात जाणे ही मुश्किल झाले आहे. शेंगा न तोडल्याने झाडास उगवून येत आहेत. त्यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शेतात दलदल निर्माण होऊन उडदासह सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.
गेल्या दहा, बारा वर्षांपासून या परिसरात सोयाबीन पीक घेण्यास सुरूवात झाली आहे. या पूर्वी तूर, उडीद, मूग आदी पिके घेतली जात होती. या पिकांची जागा सोयाबीन पिकांने घेतल्याने मोठ्याप्रमाणात सोयाबीन पेरणी होऊ लागली आहे. या पिकांस काढणीच्या वेळी फटका बसतो. मात्र यावर्षी अतिपावसाने शेत चिबडले आहे. त्यामुळे पिके पिवळी पडली आहेत. त्यावर अळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे.
कांदा लागवडीसाठी टाकलेले बियाणे वातावरणामुळे जळून गेले आहे. त्यामुळे लागवड कमी प्रमाणात होऊ लागली आहे. सुर्यप्रकाश न मिळाल्याने कांदा पिकांची पात पिवळी पडून वाकडी होऊ लागली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.