कन्या वन समृद्धी योजना

प्रत्येक गावामध्ये लोकसहभागातून वनीकरण आवश्यक आहे.
प्रत्येक गावामध्ये लोकसहभागातून वनीकरण आवश्यक आहे.

शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतामध्ये तसेच शेतबांधावर दहा वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प वन विभागाने “कन्या वन समृद्धी योजने”अंतर्गत केला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे.

 सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांच्या काळात ग्रामपंचायत क्षेत्रात साधारणत: ५ लाख ६५ हजार ६७१ मुलींचा जन्म झाला. त्यापैकी योजनेत २ लाख १५ हजार ९५३ इतके ऐच्छिक लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यांना योजनेत नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत ५ साग आणि ५ फळझाडांची रोपे देण्यात येणार आहेत. ३३ कोटी वृक्षलागवडीत ही २१ लाख ५९ हजार ५३० झाडे ही जन्मलेल्या मुलींच्या नावाने लावली जाणार आहेत.

अशी आहे कन्या वन समृद्धी योजना  ज्या शेतकरी दाम्पत्याच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांना वन विभागाकडून पाच सागाची तर पाच फळझाडांची रोपे प्रोत्साहन म्हणून दिली जातात. ५ सागाच्या रोपांशिवाय दिल्या जाणाऱ्या फळझाडांच्या रोपांमध्ये २ रोपे आंबा, १ रोप फणस, १ रोप जांभूळ तर एक रोप चिंचेचे आहे.  भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन वृक्षांची निवड करण्यात आली आहे.

विकसित होईल उत्पन्नाचा स्त्रोत मुलीच्या जन्माबरोबर वृक्ष लावल्यास मुलगी जशी मोठी होईल तसे वृक्ष ही मोठे होत जातील. तिच्या लग्नापर्यंत हे वृक्ष मोठे झालेले असतील. फळांनी लगडलेले असतील. त्यातून पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोतदेखील विकसित होऊ शकेल. सागाच्या वृक्षांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून तिच्या विवाहाच्या वेळी आवश्यकता असणारी पैशांची निकड ही भागवता येऊ शकेल.

असा घ्यायचा योजनेचा लाभ शेतकरी कुटूंबात जन्‍म झालेल्‍या मुलीच्‍या पालकांनी मुलीचा जन्‍म झाल्‍यानंतर संबंधित ग्राम पंचायतीच्‍या ठिकाणी मुलीच्‍या नावाची नोंद करावयाची आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहीत नमुन्‍यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.

सुरक्षित पर्यावरणासाठी   वाढत्या जागतिक तापमानाचे धोके कमी करायचे असतील, तर राज्यात वृक्षाच्छादन वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे हरित क्षेत्र राष्ट्रीय वननीतीनुसार ३३ टक्क्यांपर्यंत जावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन राज्याची हरित महाराष्ट्राच्या निर्मितीकडे वाटचाल सुरू आहे. कन्या वन समृद्धी योजनेचे बीज यातूनच रुजले आहे. राज्यातील जैवविविधता जपतांना भावी पिढीसाठी सुरक्षित पर्यावरण देण्याचा प्रयत्न यातून होत आहे. आपल्या नावे लागलेल्या वृक्षांप्रती आवड निर्माण झाल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाण वाढेल, पर्यावरण रक्षण, वृक्षलागवड आणि वृक्ष संगोपनाची भावना त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होईल असा विश्वास यातून व्यक्त होत आहे. शिवाय शेतकऱ्यांची कन्या खऱ्या अर्थाने शेतात, शेतबांधावर वनश्री फुलवत असून एकाअर्थाने “धनश्री” होताना दिसत आहे.

वृक्षलागवड मोहिमेत लेकीचे वृक्षांशी नाते  वन विभागाने सुरवातीला वृक्षलागवडीत लेकीचं नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला तो “माहेरची झाडी” या उपक्रमातून. सासरी जाणाऱ्या लेकीची आठवण म्हणून तिच्या हाताने माहेरच्या अंगणात विविध फळझाडांचे वृक्ष लावण्याचा संस्कार महाराष्ट्रात रुजला. आतापर्यंतच्या  वृक्षलागवडीत अनेक ठिकाणी सासरी जाणाऱ्या लेकीच्या नावे “माहेरची झाडी” लागली.  अंगणात बहरणारे लेकीचं झाडं पाहून सासरीही आपली मुलगी अशीच आनंदी असल्याचे समाधान आई-वडिलांना मिळू लागले आहे.

( लेखिका मंत्रालय, मुंबई वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com