पीकविम्याची रक्कम जमा होण्यास प्रारंभ 

बुलडाणाजिल्ह्यात गेल्या काळात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान होऊनही पीकविम्याच्या मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात नव्हती.
Start accumulating crop insurance amount
Start accumulating crop insurance amount

बुलडाणा ः जिल्ह्यात गेल्या काळात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान होऊनही पीकविम्याच्या मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात नव्हती. या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन केल्याने आता पीकविमा जमा होऊ लागला आहे. मंगळवारी (ता. ६) दहा मंडलांतील शेतकऱ्यांसाठी मदत जिल्ह्याला मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे.  जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटून मोठे नुकसान झाले होते. अशा दहा मंडलांतील शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ८५ लाख तर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून २० कोटी ८९ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे मॅसेज धडकल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे हे मोठे यश असल्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. तुपकर यांनी सोयाबीन-कापूस प्रश्‍नावर विदर्भ व मराठवाडाव्यापी आंदोलन पेटविले होते. ३१ ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात निघालेला एल्गार मोर्चा, त्यानंतर अन्नत्याग आंदोलन केले. त्यामुळे अखेर राज्य शासनाने शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी रविकांत तुपकरांना बैठकीस निमंत्रित केले होते. २४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कृषिमंत्री आणि इतर प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत तुपकरांनी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या रेटून धरल्या होत्या.  पीकविमा आणि नुकसानभरपाई मिळावी ही देखील त्यातील एक प्रमुख मागणी त्यांनी लावून धरली होती. पीकविमा व नुकसान भरपाईबाबत उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांशी चर्चा झाली होती. पीकविम्याची रक्कम तातडीने अदा करण्याबाबत आश्‍वासन दिले होते. परंतु त्यानंतरही विम्याची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने तुपकरांनी ३० नोव्हेंबर रोजी आक्रमक भूमिका घेत कृषी अधीक्षक कार्यालय गाठून ठिय्या मांडला आणि तेथेच रिलायन्स पीकविमा कंपनीचे अधिकारी शर्मन कोडीयात्तर यांना वरच्या मजल्यावर डांबून ठेवले. त्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी कृषी आयुक्तांशी संपर्क साधून रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही बातचीत केली होती. 

कंपनीने दिले होते लेखी आश्‍वासन  पीकविम्याची रक्कम दहा दिवसांत अदा करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. नुकसान भरपाईची २५ टक्के ॲडव्हान्स रक्कम म्हणून १८ हजार ४०१ शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ८५ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. उर्वरित रक्कम ही कापणी प्रयोग अहवालाचे परिणाम जाहीर झाल्यानंतर मिळणार आहे. तर जुलै ते सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीसाठी जिल्ह्याला एकूण ९९ कोटी ८५ लक्ष ३४ हजार रुपये मंजूर झाले असून, यासाठी १ लाख २२ हजार २४४ शेतकरी पात्र आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटी ८९ लक्ष ७५ हजार रुपयांची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली असून, २२ हजार ८५५ शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम दिवसभरात जमा झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com