लिलाव सुरू करा; नाशिकला बाजार समित्यांना आदेश

बाजार समित्या कामकाज सुरू करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सतीष खरे यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांना दिलेआहेत.
लिलाव सुरू करा; नाशिकला बाजार समित्यांना आदेश
लिलाव सुरू करा; नाशिकला बाजार समित्यांना आदेश

नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्चअखेर, होळी आणि शासकीय सुट्ट्या अशी विविध कारणे देत बंद आहेत. परिणामी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर ॲग्रोवनने ‘पंधरा लाख क्विंटल कांदा तुंबला’  या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. यावर बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून न घेतल्याबाबत भूमिका मांडण्यात आली होती. या वृत्ताचा आधार घेत बाजार समित्या कामकाज सुरू करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सतीष खरे यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांना दिले आहेत.   दहा दिवस बाजार समित्या बंद असल्याने जिल्ह्यातील १५ लाख क्विंटल कांदा विक्रीविना पडून राहिला आहे. परिणामी, जिल्ह्यात होणारे १३५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याबाबत वृत्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने याबाबत जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांना पत्र काढले आहे. बाजार समित्यांमध्ये २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसार लिलावाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी वर्गाकडे होळी सणामुळे मजूर उपलब्ध होणार नसल्याने तसेच सार्वजनिक सुट्टी व मार्च अखेरमुळे बँका बंद राहणार असल्याने लिलावाचे कामकाज राहणार असल्याचे कारण देण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नियमानुसार सार्वजनिक सुट्ट्या वगळता इतर दिवशी बाजार आवारातील शेतीमाल लिलावाचे कामकाज सुरळीत चालू ठेवा. शेतीमाल उत्पादक, व्यापारी व ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बाजार समितीचे स्तरावरून उचित कार्यवाही करा. बाजार समिती आवारावर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणल्यास लिलाव करून माल खरेदी करण्याची आवश्यक ती व्यवस्था करावी तसेच बाजार समिती आवारावर शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. फायदा होणार कसा?  शेतीमाल लिलाव करून माल खरेदी करण्याची आवश्यक ती व्यवस्था करावी तसेच बाजार समिती आवारात शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांची दक्षता घ्या असे आदेश देण्यात आले. मात्र अनेक बाजार समित्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालय व पणन मंडळास बाजार कामकाज बंद ठेवण्याबाबत कळविलेले नाही. मात्र शेतकऱ्यांना कळविले आहे. त्यामुळे बंदबाबत बाजार समितीकडून जाहीर करण्यात आल्याने आवक होणार नाही. मग या पत्राचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे बाजार समित्या आदेश पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com