महालगाव, जि. औरंगाबाद : रामकृष्ण उपसा सिंचन योजना शासनाने सुरू कारावी. शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्ज माफ करावे, यासाठी वैजापूर गंगापूर रोडवर भगुर फाटा येथे १४ गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.१३) रास्ता रोको केले.
एक तास सुरू असलेल्या या अंदोलनामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. या वेळी तहसीदार यांनी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून या प्रश्नी शासन स्तरावर वरिष्ठाना कळवून प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. नायब तहसीलदार रामेश्वर महाजन यांनी निवेदन स्वीकारले. ३० तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही, तर अंदोलन तीव्र करून जिल्हा बॅंकेला टाळे ठोकू. आत्मदहन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून रामकृष्ण गोदावरी जल सिंचन योजनेचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी अनेक वेळा आमरण उपोषण, रास्ता रोको अंदोलने झाली. मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे हे सर्वपक्षीय शेतकरी अंदोलन करण्यात आले. यात १४ गावांच्या २०७६ शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे यांना कुठली बॅंक कर्ज देत नाही. योजनाही बंद असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
शासनाने ही योजना ताब्यात घेऊन सुरू करावी. शेतकऱ्यांच्या सातबारावरचा कर्जाचा बोजा माफ करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मनाजी मिसाळ, ज्ञानेश्वर घोडके, राजू शेळके, ईश्वर तांबे, राजू मलिक, दिलीप आवारे, नवनाथ चव्हाण, बाळू शेळके, रामेश्वर पाटोळे, अमोल गलांडे, विक्रम निकम, सागर धनाड, जनार्दन चव्हाण, शरद चव्हाण आदींसह शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.