नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
कोल्हापुरात कोंबड्यांचे स्वॅब घेण्यास सुरुवात
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये, यासाठी राज्य शासनाचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त कार्यालय तसेच जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. या विभागांनी परसातील तसेच पोल्ट्रीतील कोंबड्यांचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये, यासाठी राज्य शासनाचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त कार्यालय तसेच जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. या विभागांनी परसातील तसेच पोल्ट्रीतील कोंबड्यांचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे. या पूर्वी दर महिन्याला स्वॅब घेतले जात होते. मात्र आता दररोज काही ठिकाणचे स्वॅब घेतले जाणार आहे. सध्या तरी बर्ड फ्लूचा काही धोका नाही, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली आहे.
राज्यात ठिकठिकाणी बर्ड फ्लूची साथ आली आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. परसातील तसेच पोल्ट्रीतील कोंबड्यांचे स्वॅब संकलन सुरू आहे. आत्तापर्यंत ५५० कोंबड्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. मात्र कोठेही बर्ड फ्लूचे लक्षण आढळून आलेले नाही.
पशुसंवर्धन विभागाकडूनही तसेही २००६ पासून पक्षांचे स्वॅब संकलन केले जात आहे. हे स्वॅब पुणे येथे पाठवले जात आहेत. कोंबड्यांसह विदेशातून आलेले पक्षी आहेत त्यांच्या विष्टेची तपासणीही केली जात आहे. रंकाळा तसेच परताळा येथे मोठ्या प्रमाणात पक्षी आले आहेत. या ठिकाणाहून दररोज विष्टा संकलन करून ती पुणे येथे पाठवली जात असल्याचे डॉ. पठाण यांनी सांगितले.
तेरा तत्काळ प्रतिसाद पथके
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये अनैसर्गिक मृत्यू आढळल्यास त्याची माहिती पशुवैद्यकीय संस्थेला देण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिला. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. रोगाची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती व बारा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे तेरा तत्काळ प्रतिसाद पथके स्थापन केली आहे.
बर्ड फ्लू प्रादुर्भाव व प्रसाराबाबत सूचना
- अचानक मोठ्या प्रमाणावर पक्षी मृत झाल्यास कळवावे
- मृत पक्ष्यांशी थेट संपर्क होणार नाही, याची खबरदारी घ्यावी
- संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक पूर्ण बंद करावी
- उघड्या कत्तलखान्यात जैव सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी
- रोगाचे जंतू संक्रमित होणार नाहीत, अशा प्रकारची यंत्रणा अत्यावश्यक
- स्थलांतरित पक्षी ज्या भागात येतात तेथे सतर्कता बाळगावी
- मांस, अंडी शिजवून खाल्ल्यास माणसांना काही धोका नाही
प्रतिक्रिया
जिल्ह्यात तेरा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून सर्व तालुक्यातील पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पशुसंवर्धन यंत्रणेला खबरदारी घेण्याचे उपाय सुचवण्यात आले आहेत. सध्या तरी भीतीचे काही कारण नाही. तरीही कुक्कुटपालन करणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. गरज भासल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा.
- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.
- 1 of 1498
- ››