मागणी असलेल्या गावांत आठ दिवसांत टॅंकर सुरू करा

मागणी असलेल्या गावांत आठ दिवसांत टॅंकर सुरू करा
मागणी असलेल्या गावांत आठ दिवसांत टॅंकर सुरू करा

सातारा : टंचाईग्रस्त गावांकडून मागणी होऊनही टॅंकर दिले जात नाहीत, यावरून पालकमंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांना धारेवर धरत तुम्हाला २० दिवस पाणी मिळाले नाही, तर तुम्ही काय कराल, असे खडसावत गावांचा टॅंकर मागणीचा ठराव आल्यानंतर किमान आठ दिवसांत टॅंकर सुरू झाला पाहिजे. त्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधून संवेदनशीलपणे काम करावे, अशी सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली. 

दरम्यान, छावण्यांसाठी सहकारी साखर कारखाने, बॅंका व पतसंस्थांना पुढाकार घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टंचाई आढावा बैठक झाली.

या वेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांताधिकारी, तहसीलदार व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चारा छावण्यांसाठी विविध ५० संस्थांनी अर्ज केले आहेत. 

याबाबत शासनाच्या निकषानुसार निर्णय होईल; पण जिल्हाधिकाऱ्यांनी सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंका व मोठ्या पतसंस्थांना आवाहन करून त्यांना चारा छावण्या सुरू करण्याबाबत एक पाऊल पुढे येण्यास सांगावे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक व संबंधित संस्थांचे अध्यक्ष, संचालकांची बैठक घेऊन त्यात छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना करावी, अशी सूचना शिवतारे यांनी केली. 

प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी टंचाईबाबत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या सोडविण्यास प्राधान्य द्या. जे प्रश्न तुमच्या पातळीवर सुटणार नाहीत ते प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा पातळीवर सोडवावेत, असे सांगून जिल्ह्यात ७७ पाणंद रस्त्यांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.

दुष्काळाचा निधी तत्काळ वाटप  खरीप हंगाम २०१८ चे दुष्काळ अनुदान ४२ कोटी ७० लाख ५९ हजार इतके उपलब्ध झाले आहे. त्यापैकी ३२ कोटी ४३ लाख ५१ हजार इतके अनुदान जिल्ह्यातील एक लाख १६ हजार ३०७ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा केले आहे. याची टक्केवारी ७५.९५ इतकी आहे. आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळ निधी जमा झाली नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ निधी वर्ग करण्याच्या सूचनाही शिवतारे यांनी केल्या. जिल्ह्यात नऊ लाख ७८ हजार ५७० शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यापैकी आजअखेर तीन लाख ४८ हजार २७२ शेतकऱ्यांची यादी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपलोड केली आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांनी आपली नावे योजनेसाठी दिली नसतील, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्‍यातील यंत्रणेशी संपर्क साधून आपले नाव यादीत समाविष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com