राज्याची फळबाग लागवड योजना बंद 

फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा)मधून फळबाग लागवड सुरु आहे.
pomegranate
pomegranate

नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा)मधून फळबाग लागवड सुरु आहे. मात्र गेल्या वर्षीपासून राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे जॉबकार्ड नाही तसेच बहुभूधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या सरकारी योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेतून फळबाग लागवड करण्यासाठी एप्रिलमध्येच प्रस्ताव मागवतात. दोन वर्षांत मात्र प्रस्तावच मागवले नाहीत. 

पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबवली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) योजनेत पात्र नसलेल्या व जॉब कार्डधारक पाच एकरांच्या आतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. मात्र जॉबकार्ड नसलेल्या व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळावे यासाठी राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली.  योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जमीन तयार करणे, खत मिश्रणाने खड्डे भरणे, कुंपण करणे, खते देणे, आंतरमशागत करावी लागते तर खड्डे खोदणे, कलमे/रोपे लागवड, नांग्या भरणे, ठिबक सिंचन करणे, पीक संरक्षणासाठी अनुदान मिळते. हेक्टरी साधारण ५३ हजार रुपयांपर्यंत योजनेतून अनुदान मिळते.  गेल्या वर्षीपासून मात्र ही योजना बंद आहे. दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात जाहिरात काढून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जातात. मात्र दोन वर्षांपासून जाहिरातच निघाली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गेल्या वर्षी ३८ हजार हेक्टरवर लागवड झाली. यंदा राज्यात ६० हजार हेक्टरवर लागवड करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) योजनेत पात्र नसलेल्या व जॉब कार्डधारक पाच एकराच्या आतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी फळबाग लागवडीपासून वंचित आहे. योजना कधी सुरू होणार हे विचारण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी विभागात चकरा सुरू आहेत.  कोरोनाचा परिणाम  गेल्या वर्षीपासून राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे राज्यावर आर्थिक ताण आला आहे. त्याचाच परिणाम म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच मागेल त्याला शेततळे योजनाही गेल्या वर्षीपासून बंद आहे. याशिवाय कृषी विभागातील अन्य काही योजनांच्या निधीतही कपात झाल्याचे सांगितले जात आहे.  प्रतिक्रिया बहुभूधारक, जॉब कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लावण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर योजनेतून फळबाग लागवड योजना आहे. मात्र गेल्या वर्षीपासून योजना बंद आहे. त्यामुळे आमचे फळबाग लावण्याचे नियोजन असून लागवड करता येईना. अन्य सगळ्या योजना सुरू आहेत. त्यामुळे ही योजनाही सुरू करणे गरजेचे आहे.  - प्रा. नामदेव सानप, शेतकरी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com