राज्याची खरीप आढावा बैठक ३ जूनला शक्य

खरिप आढावा बैठक
खरिप आढावा बैठक

मुंबई: लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेली राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक सोमवारी(३ जून) होण्याची शक्यता आहे. राज्यातील खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा या बैठकीत होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बैठकीला मार्गदर्शन करतील. महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत दादरच्या रवींद्र नाट्यमंदिरात ही बैठक होणार असल्याचे सांगितले जाते.  सतराव्या लोकसभेसाठी राज्यात चार टप्प्यात मतदान झाले. २९ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. तोपर्यंत जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर यंत्रणेने खरीप हंगामाच्या तयारीला हात घातला. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यांच्या ठिकाणी हंगामाच्या तयारीचा आढावा सुरू आहे. आता राज्यस्तरीय बैठकीत राज्याच्या एकंदरीत तयारी आढावा घेतला जाईल. एरवी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यस्तरीय आढावा बैठक होत असते, पण लोकसभा निवडणुकीमुळे यंदाची राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारीची बैठक सुमारे महिनाभर लांबली आहे. येत्या ३ तारखेला ही बैठक होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात ही बैठक होईल.  या बैठकीसाठी सुमारे चारशे मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. कृषी खात्यांसह सहकार आणि इतर विविध विभागांचे प्रमुख, कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांमधील कृषी समित्यांचे सभापती आदींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. कृषी खात्याचे राज्यभरातील उच्चपदस्थ अधिकारीही या वेळी उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय सहकार विभागाचे उच्चपदस्थही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नाबार्ड, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच इतर बँकांचे पदाधिकारीही बैठकीला येतील.  बैठकीत खरिपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यंत्रणेला मार्गदर्शन करतील. कृषी खात्याला सरकारी यंत्रणेला प्रोत्साहित करण्याचे काम या वेळी केले जाईल. शेतकऱ्यांना विशेषतः खते, बी-बियाणे पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर पुरवठा करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी पतपुरवठा महत्त्वाचा असतो. यासंदर्भातही धोरण निश्चित केले जाणार असल्याचे कृषी खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.  लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले आहे, येत्या ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेतील यशामुळे फडणवीस सरकारचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरील या आगामी खरीप हंगामाच्या तयारीत कोणतीही कसूर राहू नये याची खबरदारी राज्य सरकारच्यावतीने घेतली जाईल, अशी शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com