राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू

राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू

मुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी आणि आगामी हंगामातही दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात अपुरा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत असल्याने फडणवीस सरकार दुष्काळी पट्ट्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या विचारात आहे. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने तसा प्रस्ताव तयार करून तो वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. गेल्या वर्षी राज्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागली. चालू वर्षी राज्यात १९७२ पेक्षाही मोठी दुष्काळी स्थिती असल्याचे चित्र आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा याची मोठी  टंचाई आहे. शेती विशेषतः दुष्काळी भागात फळबागांच्या क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातच याही वर्षी राज्यातील दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात प्रतिकूल पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात लगेचच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. येत्या हंगामातही दुष्काळी स्थिती कायम राहिली तर अजूनच शेतकरी आणि नागरिकांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता आहे. याचे पडसाद आगामी निवडणुकीतही उमटू शकतात. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगांची तयारी सुरू केली आहे.  राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून तो पुढील मान्यतेसाठी वित्त विभागाला सादर केला आहे. वित्त विभागाचा हिरवा कंदील मिळताच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवला जाईल, असे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतर टेंडर प्रक्रिया करून कंपनीची नियुक्ती केली जाईल.  कृत्रिम पावसाच्या प्रयोगांसाठी सुमारे तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यातील पावसाचा अंदाज येताच राज्य शासनाकडून कृत्रिम पाऊस पाडण्याचे निश्चित केले जाईल. त्यासाठीचे केंद्र कुठे असेल हे ठरवले जाईल. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये राज्यातील दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले जातील. राज्यात २००३ साली पहिल्यांदा कृत्रिम पावसाचे प्रयोग राबवण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला होता. २००३ साली राज्यात झालेल्या प्रयोगाच्या वेळी ‘पायपर शाइन’ या विमानातून ढगांमध्ये पावसाची बिजे फवारण्यात आली होती. त्यानंतर २०१५ मध्येही राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत. प्रयोगांमध्ये सातत्य हवे, तरच अपेक्षित लाभ राज्यात कमी पाऊस पडणाऱ्या तालुक्यांची संख्या मोठी आहे. जवळजवळ एक-तृतीयांश भागावर बहुतांश वर्षी अपुराच पाऊस असतो. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुष्काळाची वाट पाहणे योग्य नाही. चीनमध्ये चांगला पाऊस पडत असतानासुद्धा हे प्रयोग हाती घेतले जातात. या प्रयोगांमध्ये सातत्य लागते. आपल्याकडे मात्र दुष्काळ पडल्यावर जाग येते आणि बरा पाऊस झाला की प्रयोग थांबतात, मग त्याचा लाभ कसा होणार असा सवाल या क्षेत्रातील जाणकार करीत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com