राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस

राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस
राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पाऊस पडला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यात सरासरी १००४. २ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तब्बल १३२८.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा तब्बल ३२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात ५५ टक्के अधिक, कोकणात ५२ टक्के, तर विदर्भात १२ टक्के अधिक पाऊस झाला असला; तरी मराठवाड्यात मात्र १२ टक्के कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

यंदा महाराष्ट्रात मॉन्सूनचे उशिराने आगमन झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पाऊस कमी पडून दुष्काळ स्थिती निर्माण होण्याची भीती वर्तविण्यात येत होती. मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात माॅन्सूनने दमदार हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक नद्यांनी रौद्र रूप धारण केले. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरात महापुराने हाहाकार माजला होता. याचवेळी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात मात्र पावसाची ओढ कायम होती. मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मात्र ही कसर काहीअंशी भरून निघाली. विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाने सरासरी गाठली. तळाशी गेलेली सर्वच धरणे भरून नद्यांना पूर आले. तर, जायकवाडी धरण ओसंडून वाहूनही मराठवाड्यात पावसाची ओढ कायम आहे. अद्याप परतीच्या पावसाला सुरवात झाली नसून, या काळात मराठवाड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.  

सोलापुरात ‘ओढ’; तर पुण्यात ‘झोड’  हवामान विभागाकडील नोंदीनुसार मध्य महाराष्ट्रात मॉन्सून मुक्तहस्ते कोसळला असतानाच सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ देत सर्वांत कमी म्हणजेच सरासरीपेक्षा उणे ३८ टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे शेजारीच असलेल्या पुणे जिल्ह्याला झोडून काढत सर्वाधिक म्हणजेच सरासरीपेक्षा १०९ टक्के अधिक पाऊस पडला. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात उणे २७ टक्के, लातूर उणे २२ टक्के, उस्मानाबाद, परभणीत उणे १५ टक्के, हिंगोली उणे १६ टक्के; तर जालन्यात उणे १३ टक्के पाऊस झाला. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही उणे २० टक्के, यवतमाळमध्ये उणे ३० टक्के, तर गोंदियात उणे ३ टक्के पाऊस पडल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

भूममध्ये सर्वांत कमी,  मावळमध्ये सर्वाधिक पाऊस कृषी विभागाच्या ‘महावेध’ प्रकल्पाअंतर्गत राज्यातील पावसाच्या नोंदीनुसार यंदाच्या पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे केवळ ४८.२ टक्के पाऊस पडला. तर, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सर्वाधिक २६२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर धुळे जिल्ह्यातील साक्री, नगरमधील अकोला, पुण्यातील खेड, साताऱ्यातील कराड, सांगलीतील शिराळा, कोल्हापुरातील करवीर, कागल, भुदरगड या तालुक्यामध्ये २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. कृषी विभागाकडील नोंदीनुसार राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी ३८ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, ११२ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के; तर २२० तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

देशात २५ वर्षांनंतर दमदार मॉन्सून हंगामात देशात यंदा ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. १९९४ मध्ये देशभरात ११० टक्के पाऊस पडला होता. त्यानंतर यंदा देशात दमदार पाऊस पडला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तब्बल ९६८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व सिक्कीम राज्यात यंदा जोरदार पाऊस झाला. तर मणिपूर, जम्मू-काश्मीर आणि हरियाना राज्यात सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला. मध्य प्रदेशात सर्वाधिक १४४ टक्के, तर मणिपूरमध्ये सर्वांत कमी अवघा ४४ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्यात (६७ टक्के) पावसाने ओढ दिल्यानंतरही जुलै महिन्यात १०५ टक्के, ऑगस्ट महिन्यात ११५ टक्के आणि सप्टेंबर महिन्यात १५२ टक्के पाऊस झाल्याने हंगामच्या शेवटी सरासरी ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

५० ते ७५ टक्के पाऊस पडलेले तालुके  नाशिक - इगतपुरी ७०.१, नगर - कर्जत ७०.७, सोलापूर - उत्तर सोलापूर ७१.७, दक्षिण सोलापूर ७२.६, बार्शी ७२.३, अक्कलकोट ७०.६, मोहोळ ६२.२, माढा ६९.१, करमाळा ५६.७, पंढरपूर ५२.७, सांगोला ७३.९, मंगळवेढा ६२.८, जालना - बदनापूर ६५.६, बीड - पाटोदा ६९.५, आष्टी ७१.८, अंबाजोगाई ६४.४, केज ६१.७, धारूर ६२.४, वाढवणी ६४.८, लातूर - लातूर ६३.२, औसा ६९.६, चाकूर ५७.३, देवणी ६०, शिरूर अनंतपाळ ७३.४, उस्मानाबाद - उस्मानाबाद ६१.९, परांडा ५३.३, कळंब ६१.३, उमरगा ७२.१, वाशी ६९.२, नांदेड - हिमायतनगर ७०.४, परभणी - परभणी ७१.४, जिंतूर ६७.६, सेलू ७०.९, अकोला - मूर्तिजापूर ५८.१, यवतमाळ - केळापूर ७२.९, घाटंजी ७१.८, गोंदिया - सालकेसा ७२.१, चंद्रपूर - राजुरा ७२.०.

हवामान विभागनिहाय पडलेला पाऊस (स्रोत - हवामान विभाग)
विभाग सरासरी पाऊस (मि.मी.) पडलेला पाऊस (मि.मी.) टक्केवारी
कोकण २८७५.३ ४३८५.८ १५३
मध्य महाराष्ट्र ७५१.२ ११६६.९ १५५
मराठवाडा १६८.८ ५९०.७ ८८
विदर्भ ९४३.१ १०५४.६ १२२
मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती (स्रोत - हवामान विभाग) 
जिल्हा सरासरी पाऊस  (मि.मी.) पडलेला पाऊस  (मि.मी.) टक्केवारी
पालघर २३०५.४ ३८८३.४ १६८
रायगड ३१४८.७ ३८८३.४ १५७
रत्नागिरी ३१९५.१ ४६८४.९ १४७
सिंधुदुर्ग २९४०.५ ४२७०.० १४५
ठाणे २४३३.४ ४०८४.९ १६८
नगर ४४८.१ ५२५.२ ११७
धुळे ५३५.१ ९६७.८ १८१
जळगाव ६३२.६ ८७०.१ १३८
कोल्हापूर २९२७.५ १७३३.१ १६९
नंदुरबार ८६०.४ १३४४.९ १५६
नाशिक ९३३.८ १५५४.६ १६६
पुणे ८६१.५ १८०३.१५ २०९
सांगली ५१४.५ ६५०.४ १२६
सातारा ८८६.२ १४१८.७ १६०
सोलापूर ४८१.१ २९९.६ ६२
औरंगाबाद ५८१.८ ६०७.३ १०४
बीड ५६६.१ ४१२.२ ७३
हिंगोली ७९५.३ ६६७.४ ८४
जालना ६०३.१ ५२६.२ ८७
लातूर ७०६.० ५५०.९ ७८
नांदेड ८१४.३ ८१४.४ १००
उस्मानाबाद ६०३.१ ५१४.१ ८५
परभणी ७६१.३ ५१४.१ ८५
अकोला ६९३.८ ८२०.० ११८
अमरावती ८६२.० ८९२.१ १०३
भंडारा ११५७.० १२२२.९ १०६
बुलडाणा ६५९.४ ६६९.८ १०२
चंद्रपूर १०८३.९ १२६९.० ११७
गडचिरोली १२५४.२ १८५०.५ १४८
गोंदिया १२२०.२ ११८३.९ ९७
नागपूर ९२०.४ ११६९.८ ९२०.४
वर्धा ८७४.५ ९५३.१ १०९
वाशिम ७८९.० ६३४.० ८०
यवतमाळ ८०५.० ५६३.८ ७०
मॉन्सून हंगामात महिनानिहाय पडलेला पाऊस (स्रोत : हवामान विभाग) 
महिना सरासरी पडलेला टक्केवारी
जून २०७.६ १५५.३ ७५
जुलै ३३०.९ ४४७.२ १३५
ऑगस्ट २८६ ३८१.१ १३३
सप्टेंबर १७९.७ ३४४.९ १९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com