सोलापूर : राज्य शासनाने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांना शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ मिळाला. याअंतर्गत १९ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पाणलोट विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी व्यवस्थापक रवींद्र माने यांनी दिली.
मागेल त्याला शेततळे योजना फेब्रुवारी २०१६ रोजी सुरू झाली. याअंतर्गत शेततळ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. ०.६० हेक्टरपेक्षा जास्त जमीनधारक शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थ्यांची निवड करताना दारिद्य्र रेषेखालील किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ज्येष्ठतेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाते. जिल्ह्याला ८००० शेततळ्यांचे उद्दिष्ट शासनाने दिले. शेतकऱ्यांनी योजनेला सुरवातीपासूनच चांगला प्रतिसाद दिला.
या योजनेअंतर्गत दोन वर्षांत २४ हजार १६८ अर्ज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले होते. त्यापैकी १६ हजार १८४ अर्जांना मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्ष कार्यारंभ करताना १५ हजार २२८ कामांना मंजुरीबाबत आदेश देण्यात आला. निकषांनुसार पडताळणी करून एकूण ८ हजार १२१ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली. त्यापैकी ४ हजार ६२४ शेततळे बांधून पूर्ण झाली असून, त्यापैकी ४ हजार ४८५ शेततळ्यांसाठी एकूण १९ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे श्री. माने यांनी सांगितले.