कोल्हापूर, सांगलीतील पुरात संथ घट

सांगली पूर
सांगली पूर

पुणे : निसर्गाचा रुद्रावतार अनुभवत असलेल्या कोल्हापूर, सांगली भागांत महापुराने सव्वाचार लाख नागरिक बेघर झालेले आहेत. मात्र ग्रामीण भागात अडकलेल्या नागरिकांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. बळींची संख्या तीसवर पोहोचली आहे; तर दहा जण बेपत्ता आहेत. कागदपत्रांबाबत ताठर भूमिका न घेता सरकारी मदतीचे वाटप करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. दरम्यान, पुराच्या पातळीत थोडी घट झाली आहे. “कोल्हापूर व सांगलीत अजूनही नद्या धोक्याची पातळी सोडून वाहत आहेत. कोल्हापूरला पुराची मूळ धोक्याची पातळी ४३ फूट असताना तेथे अजूनही पातळी ५१ फूट आहे. ४५ फूट धोका पातळी असलेल्या सांगली भागात अजूनही ५६ फूट पातळी आहे. आलमट्टी धरणातून ५.३० लाख क्युसेक विसर्ग आहे. मात्र या धरणाच्या लाभ क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने तेथे ६ लाख क्युसेकने पाणी जमा होत आहे. त्यामुळे आपल्यापेक्षाही कर्नाटक सरकारला आता आलमट्टीतून जादा पाणी सोडण्याबाबत घाई आहे. अर्थात, तेथील गावांनाही महापुराने विळखा घातला आहे,” अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी (ता. १०) पत्रकारांना सांगितले.  

“मुख्य धरण क्षेत्रात अतिवृष्टी न झाल्यास पूरपातळी रविवारी सायंकाळपासून कमी होण्याची शक्यता आहे. अजूनही ग्रामीण भागात किती लोक अडकलेले आहेत याचा अंदाज आलेला नाही. मात्र स्थलांतरित नागरिकांची संख्या आता ४ लाख १३ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यांना ५३५ निवारा केंद्रांमधून सातत्याने मदत केली जात आहे. पूरग्रस्तांना हवाई मार्गाने दुसऱ्या दिवशी अन्न किंवा पाण्याचे वाटप झालेले नाही. त्यासाठी दोन हेलिकॉप्टर्स तयार आहेत. मात्र नेव्ही व एनडीआरएफच्या बोटीनेच अन्न-पाणी पोहोचविण्यास प्राधान्य दिले जात आहे. बोटी पोचत नसलेल्या भागात हवाई मार्गाचा वापर केला जाईल,” असेही ते म्हणाले.     २७ तालुक्यांना पुराचा फटका सांगली २८ हजार ५३७ कुटुंबे स्थलांतरित असून व्यक्तींची संख्या १ लाख ४३ हजार आहे. तेथे ११७ निवारा केंद्रे आहेत. कोल्हापूरला ४८ हजार ५८८ कुटुंबांतील २ लाख ३३ हजार १५० व्यक्ती स्थलांतरित असून, निवारा केंद्रे १८७ आहेत. तेथे ८ तालुके व २४९ गावे बाधित झाली आहेत. सातारा भागात १० हजार, तर सोलापूरला सहा तालुक्यांतील २६ हजार ९६२ आहेत. निवारा केंद्रे १०२ ठिकाणी उघडली गेली आहेत. पूर व अतिवृष्टीने पुणे विभागातील ५८ पैकी २७ तालुक्यांना तडाखा दिला आहे. ५८५ गावे बाधित झाल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे. 

४७ मार्ग अजूनही बंद  महापुरामुळे ४७ गावांचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे. एकट्या कोल्हापूर भागात अद्यापही ५८ हजार लोकांशी संपर्क झालेला नाही. मात्र इतर ४७ हजार नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले आहे. सांगलीत ४७ रस्ते, १६ राज्य मार्ग व ३१ जिल्हा मार्ग असे ४७ मार्ग बंद आहेतत. 

ब्रह्मनाळ दुर्घटनेतील मृतदेह सापडले सांगलीच्या ब्रह्मनाळ भागातून खटावच्या दिशेने जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील आणखी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. सुरेखा मधुकर नरुटे (४५), रेखा शंकर वावरे (४०), तसेच चार वर्षांच्या मुलीचा त्यात समावेश आहे. 

पशुधनाचा अंदाज पाणी उतरल्यानंतर पुरामुळे २० गायी, २३ म्हशी, वासरे ६, ३८ शेळ्या व १० हजार ६०० कोंबड्या मृत झाल्याची माहिती पूरग्रस्त भागातून आली आहे. मात्र पाणी उतरल्यानंतरच ग्रामीण भागाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

३०२ वैद्यकीय पथके तैनात  पूर ओसरताच साथीचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता व वैद्यकीय कामासाठी ३०२ पथके तैनात केली गेली आहेत. यात सांगलीला ८०, कोल्हापूरला १५० व साताऱ्यात ७२ पथके असतील. दरम्यान, पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य अव्याहतपणे सुरू आहे. त्यात सांगली ३७ पथके, ९५ बोटी व ५६९ जवान आहेत. कोल्हापूरला ४५६ जवानांनी ४८ पथके तयार करून ७४ बोटींमधून मदत सुरू ठेवली आहे. 

कर्नाटकसाठी सोलापूर मार्गांचा वापर बंगळूर-पुणे महामार्ग अद्याप बंदच आहे. चार क्रमांकाचा महामार्गही कागल, शिरोलीत बंद आहे. त्यामुळे कर्नाटकात जाणाऱ्यांना सोलापूर मार्गे पाठविले जात आहे. कोल्हापूरचा रस्ता संपर्क लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र प्रथम मदतकार्याची वाहने जातील. कारण सामान्य वाहतूक जरी कोल्हापूरकडे पाठविली तरी ती पुढे कर्नाटकात पूर असल्याने अडकून पडतील. त्यामुळे राज्याचे पोलिस महासंचालक याबाबत नियोजन करीत आहेत.

मदतीसाठी ग्रीन कॉरिडॉर पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. काॅरिडाॅरमधून सांगलीला मदत पाठविली जात असून, कोल्हापूरला अजूनही संपर्क झालेला नाही. विजेची रोहित्रे, औषधे व इतर मदत पाठविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केले जात आहे. कोल्हापूर मार्ग मोकळा होताच तेथे गॅस, डिझेल, पेट्रोल पुरविले जाणार आहे. दरम्यान, पुण्यात मदत केंद्रासाठी तीन उपजिल्हाधिकारी नियुक्त केलेले आहेत. यात नीता सावंत ९४२१११८४४६, आरती भोसले ९८२२३३२२९८, सुरेखा माने ७७७५९०५३१५ यांचा समावेश आहे. नागरिकांनी मदत सामग्री केवळ सरकारी यंत्रणेमार्फतच पाठवावी. कारण त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला जात असून, स्वतंत्र गेल्यास वाहने अडकून पडू शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

आधार क्रमांकावर मदतवाटप मदतवाटपाबाबत बॅंकांची बैठक घेण्यात आली आहे. अनेक एटीएम बंद आहेत. ते पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रोकड ही अडचण नाही. मात्र तांत्रिक बिघाड दूर केले जातील, असे बॅंकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात यूआयडीच्या बेसवर रक्कम वाटप करावी. पासबुक गहाळ झाले म्हणून मदत नाकारू नये, अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. अलमट्टीतून आवक जास्त, विसर्ग कमी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या अलमट्टी धरणातून शनिवारी (ता. १०) सकाळी सहा वाजल्यापासून पाच लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती कर्नाटकातील मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटद्वारे दिली आहे. तर अलमट्टी धरणामध्ये पाच लाख १५ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. याशिवाय कृष्णा नदीवरील नारायणपूर धरणात पाच लाख ५० हजार क्युसेकने आवक होत असून, सुमारे पाच लाख ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याचे कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पूरस्थितीला तेथील सरकार जबाबदार असल्याचा आरोप करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मात्र अद्यापही अलमट्टीतून होणारा विसर्ग न वाढविल्याने पूरस्थिती जलदगतीने कमी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्रातील पूरग्रस्तांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com