जळगाव ः रब्बी हंगाम कालावधी अर्धा अधिक संपला तरीदेखील शेतकऱ्यांना वाघूर प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.
वाघूर प्रकल्पातील पाण्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर व जळगाव या तालुक्यांमधील शिवाराला लाभ होतो. परंतु पाणी भुसावळ व जळगाव तालुक्यातील शिवारात पोचलेले नाही. एकही आवर्तन न सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. काही तांत्रिक बाबींमुळे पाणी सोडण्यास यंदा अडचण आल्याचे सांगितले जात आहे. जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोनदा पाणी सोडण्याची मागणी केली आहे. परंतु पाणीच सोडलेले नसल्याने दादर ज्वारी, हरभरा या पिकांचे सिंचन करण्यासंबंधी अडचणी आल्या आहेत.
जिल्ह्यात सुमारे २१ हजार हेक्टरवरील रब्बीला लाभ पोहोचविणाऱ्या गिरणा धरणातून या महिन्यातच पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. हे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. भडगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव या तालुक्यांना पाण्याचा लाभ झाला. तसेच गिरणा नदीतही पाणी सोडण्यात आले होते. यामुळे सुमारे १०० गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची जलपातळी वाढली. पुढे पाणीटंचाई कमी होईल, अशी स्थिती आहे.
भुसावळ तालुक्यानजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरणातूनही सर्वप्रथम आवर्तन सोडण्यात आले होते. रावेर, यावल, चोपडा तालुक्यास त्याचा लाभ झाला आहे. लवकरच दुसरे आवर्तन सोडले जाईल, अशी माहिती मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून दादर ज्वारी, हरभरा यासह कापूस पिकाचे सिंचनही करण्यास मदत झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.