जळगाव : खानदेशात शासकीय कापूस खरेदी वेगात सुरू आहे. कापूस महामंडळाने (सीसीआय) विविध केंद्रांमध्ये मिळून सुमारे सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. पणन महासंघाच्या खरेदीसही चांगला वेग आला होता. परंतु, पणनच्या केंद्रातील सरकीचा साठा वाढल्याने आणि कापूस साठवणुकीसाठी हवी तेवढी जागा कारखान्यात नसल्याने ही खरेदी मागील काही दिवसांपासून बंद आहे.
पणन महासंघातर्फे जळगाव जिल्ह्यात पारोळा, धरणगाव व धुळे येथे कापूस खरेदी सुरू आहे. या केंद्रांमध्ये मागील पंधरवड्यात प्रतिदिन सुमारे दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. पण, नंतर सरकीचा साठा वाढला. शिवाय कापूस साठवणुकीसाठीदेखील हवी तशी जागा राहिली नाही. यामुळे वरिष्ठ कार्यालयाने कापूस खरेदी सरकीचा साठा कमी झाल्यानंतर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे महासंघाचे केंद्र या आठवड्यात बंद केले आहेत.
महासंघाच्या काही केंद्रांमधील सरकीचा साठा सौदे यशस्वी झाल्याने कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, ‘सीसीआय’च्या सरकीचे सौदे व्यवस्थित झाल्याने केंद्रही सतत सुरू आहेत. ‘सीसीआय’तर्फे जळगाव जिल्ह्यात बोदवड, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार येथे कापूस खरेदी सुरू आहे. तिथे सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली.
खरेदीला वेग आल्याने बाजारातील कापूस दर ५००० ते ५१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून आहेत. ‘सीसीआय’तर्फे कमी दर्जाच्या कापसासाठी ५४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. जळगाव येथील केंद्रात ‘सीसीआय’तर्फे पाच हजार कापूस गाठींचे उत्पादन झाले आहे. १२ टक्क्यांवरील आर्द्रतेचा कापूस खरेदी करणे ‘सीसीआय’च्या केंद्रात टाळले जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.