शून्य ऊर्जा शीतकक्ष हा फळे व भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी अतिशय स्वस्त पर्याय आहे. या कक्षासाठी कोणत्याही यांत्रिक, रासायनिक आणि विद्युतऊर्जेची आवश्यकता नसते. या पद्धतीद्वारे फळे, भाज्यांची साठवणक्षमता टिकवण्यास मदत होते. फळे व भाजीपाला काढणीनंतर काही काळातच त्यांचा ताजेपणा कमी होऊन खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता टिकवणे आवश्यक आहे. काढणीनंतर त्यांच्यावर विविध प्रक्रिया व साठवण पद्धतींचा वापर केल्यास होणारे नुकसान टाळता येते.
प्रक्रियेमुळे फळे व भाज्या बिगर हंगामात उपलब्ध होतात. त्यांची चव वर्षभर चाखता येते. प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना बाजारात चांगली किंमत मिळते. प्रक्रियायुक्त पदार्थ निर्जंतुक केले जातात, त्यामुळे ते खाण्यास सुरक्षित असतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रक्रियायुक्त डबाबंद फळे व भाज्यांचा उपयोग होतो. काही देशांमध्ये विशिष्ट फळे व भाज्या पिकत नाहीत, तेथे निर्यात केल्यास चांगले परकीय चलन उपलब्ध होते. फळांचा गर टिकविण्याची पद्धत
या पद्धतीमध्ये फळांचा रस हवेच्या कमी दाबावर व कमी तापमानावर आटवून निर्जंतुक केला जातो. त्यानंतर प्लॅस्टिक बॅग किंवा टीनच्या डब्यामध्ये हवाबंद केला जातो. हवाबंद केल्यामुळे त्यामध्ये बाहेरील जीवजंतूंचा शिरकाव होत नाही व तो पदार्थ जास्त काळ टिकतो. बाजारात मिळणाऱ्या विविध अन्नपदार्थांवर प्रक्रिया केली जाते, त्यामुळे ते जास्त टिकून राहतात. लॅमिनेटेड पाऊचमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. पाऊचमधील सर्व हवा काढून त्यात नायट्रोजन वायू भरण्यात येतो. नायट्रोजन निष्क्रिय वायू असल्यामुळे पदार्थांवर कुठलीही प्रक्रिया न होता तो जास्त दिवस टिकतो. फळे व भाज्या जास्त काळ साठवण्यासाठी सुकवणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. निर्जलीकरण म्हणजे भाजीपाल्यातील पाणी बाहेर काढून टाकणे. हे करताना भाजीपाल्यातील पोषकमूल्य आणि पेशीरचना यांमध्ये कोणताही बदल होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. तांत्रिक पद्धतींच्या वापराने भाजीपाल्यातील पाण्याचा अंश कमी करून साठवण कालावधी वाढविता येतो. भाजीपाल्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यास, पदार्थ सुरक्षित राहतात. शून्य ऊर्जा शीतकक्ष फळे व भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी हा एक अतिशय स्वस्त पर्याय आहे. या कक्षासाठी कोणत्याही यांत्रिक, रासायनिक आणि विद्युतऊर्जेची आवश्यकता नसते. या पद्धतीद्वारे फळे व भाज्यांची प्रतवारी व साठवणक्षमता टिकवण्यास मदत होते. शून्य ऊर्जा शीतकक्षाची बांधणी
विटांनी १६५ बाय ११५ सेंमी आकाराचा समतल पृष्ठभाग तयार करावा. तयार पृष्ठभागावर ७० सेंमी उंचीची चारी बाजूंनी दुहेरी भिंत बांधावी. दोन भिंतीमध्ये ७.५ सेंमी अंतराची पोकळी ठेवावी. कक्षाच्या भिंती पाण्याने व्यवस्थित ओल्या कराव्यात. दोन भिंतींच्या दरम्यानची पोकळी ओल्या वाळूने भरावी. यासाठी शक्यतो नदीपात्रातील वाळूचा वापर करावा. कक्षावर बांबू, गहू किंवा भाताचा पेंढा व वाळलेले गवत यापासून बनवलेले छप्पर ठेवावे. कक्षामध्ये प्लॅस्टिक क्रेट किंवा बास्केटमध्ये फळे व भाजीपाला साठवता येतो. थेट सूर्यप्रकाश, पाऊस व धूळ यांपासून कक्षाला संरक्षण देण्यासाठी छप्पर घालणे आवश्यक आहे. संपर्क: शैलेश वीर, ७७२०९३४९३३ (अन्न अभियांत्रिकी विभाग, शिवरामजी पवार ग्रामीण अन्नतंत्र महाविद्यालय, नांदेड)