बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यास ते बियाण्याच्या अंकुरणक्षमतेला हानीकारक असते. तसेच बियाण्यांची चांगल्या प्रकारे व अधिक काळापर्यंत साठवणूक करण्यासाठी थंड वातावरण अधिक उपयुक्त असते. शुद्ध व उत्तम गुणधर्म असलेले बियाणे कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक आहे. साठवणुकीत बियाण्याची उगवण क्षमता व जोम यावर प्रामुख्याने बियांतील ओलाव्याचे किंवा वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण, साठवणुकीच्या काळातील तापमान, साठवणुकीच्या काळातील वायू, बियाण्याची भौतिक स्थिती, आनुवंशिकता, अतिसूक्ष्म जिवाणू व किडी आणि बियांची सुरुवातीची उगवणक्षमता व जोम याचा परिणाम होतो. यापैकी बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण आणि बीज भांडारातील तापमान व वातावरणातील आर्द्रता यांचे महत्त्व अधिक आहे. वातावरणातील आर्द्रता व तापमान
बियाण्याची योग्य प्रकारे साठवण करण्याचा मुख्य उद्देश बियाण्यांची अंकुरणक्षमता व जोम यात होणारी घट कमी करणे हा होय. साठविलेले बियाणे आणि इतर पदार्थ यांचे साठवणीत नुकसान करणाऱ्याय काही किडींचा अभ्यास केल्यास त्यात काही बाबतीत बराचसा सारखेपणा आढळतो. उबदार व दमट हवामानात सर्वच कीटकांची वाढ झपाट्याने होते. ३० अंश सेल्सिअस उष्ण तापमान व ६० टक्क्यांहून जास्त आर्द्रता असली, की कीटकांना ते पोषक ठरते. साठवणुकीत बियाण्याचे आयुष्यमान हे हवेतील आर्द्रता आणि तापमान या घटकांवर बरेचसे अवलंबून असते. हॅरिंग्टन नावाच्या शास्त्रज्ञाने १९५९ मध्ये तापमान व हवेतील आर्द्रतेचे महत्त्व ओळखून त्यांचे बियाण्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम दाखवण्यासाठी दोन साधे नियम दिले आहेत. बियाण्यातील ओलाव्याच्या प्रमाणात होणाऱ्या प्रत्येक एक टक्का वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते किंवा बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १ टक्क्याने कमी केल्यास बियाण्याचे आयुष्य दुपटीने वाढते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण अंदाजे ५-१४ टक्के दरम्यान असल्यास हा नियम लागू होतो. बियाणे साठवणुकीच्या तापमानात होणाऱ्या प्रत्येक ५ अंश सेल्सिअस वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते. किंवा साठवणुकीचे तापमान ५ अंश सेल्सिअसने कमी केल्यास बियाण्याचे आयुष्य दुपटीने वाढते. हा नियमसुद्धा साठवणुकीतील तापमान ० ते ५ अंश सेल्सिअस दरम्यान असेल, तेव्हाच लागू होतो. आर्द्रतेमुळे बियाण्यात उष्णता वाढते व त्यास कुबट वास येऊ लागतो. त्याच्या चवीत फरक पडतो. त्यास कडवटपणा येतो आणि त्यावर बुरशी वाढते. असे बियाणे खाण्यासही योग्य राहत नाही. कोठारामध्ये जमिनीतून अगर खिडकीतून तसेच भिंतीतून ओल आल्यास बियाणे खराब होण्याचा संभव असतो. वातावरणात आर्द्रता जास्त असल्यास साठवलेल्या बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाणही वाढते. आर्द्रतेचे प्रमाण ० ते २५ टक्के दरम्यान असल्यास, बियाण्यातील ओलावा अधिक जलद प्रमाणात वाढतो. २५ ते ७० टक्के दरम्यान मध्यम गतीने तर ७० ते १०० टक्के दरम्यान पुन्हा जलद गतीने वाढतो. सर्वसाधारणपणे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यास ते बियाण्याच्या अंकुरणक्षमतेला हानीकारक असते. तसेच बियाण्यांची चांगल्या प्रकारे व अधिक काळापर्यंत साठवणूक करण्यासाठी थंड वातावरण अधिक उपयुक्त असते. थंड (१५ अंश सेल्सिअसपेक्षा खाली) व उष्ण (४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त) तापमान किडींना हानिकारक असते. साधारणपणे तापमानात जसजशी वाढ होत जाते, तसतसे बियाण्यांच्या आयुष्यमानात घट होत जाते. संपर्कः भागवत चव्हाण, ९४०४५५१००९ (कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी.)