अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी आलेल्या जोराचा वारा व वादळामुळे केळीचे अतोनात नुकसान झाले होते. त्यासाठी विम्याचा लाभ मिळावा म्हणून शेतकरी सातत्याने प्रशासनाने पाठपुरावा करीत आहेत. यंदा मार्च महिन्यात अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चाही काढण्यात आला. तेव्हा तातडीने कारवाईचे आश्वासन देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत मात्र, जिल्ह्यातील केळी उत्पादकांना काहीही मिळालेले नाही. २२ मार्च २०२१ रोजी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात केळी उत्पादकांचा मोर्चा काढण्यात आला होता. पणज मंडळातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेत चर्चा केली. या बैठकीत एनडीआरएफच्या झालेल्या पंचनाम्यानुसार ताळमेळ करून आणि योग्य चौकशी करीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत तेव्हा शेतकऱ्यांना लेखी पत्रही देण्यात आले होते. वस्तुस्थिती दर्शक अहवाल विमा कंपनीला सादर करून तत्काळ भरपाई देण्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, या बैठकीनंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पणज ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर पत्र लिहिले आहे. तोडगा काढण्याची मागणी या प्रकरणी कृषी विभागाने तातडीने तोडगा काढावा. केळी उत्पादकांना विमा मिळवून देण्यासाठी काय कारवाई झाली त्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. सात दिवसांत या बाबत काहीही न झाल्यास पुन्हा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.