तेलगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील बालासाहेब रामकिशनराव राऊत यांनी व्यावसायिक व बहुविध पीकपद्धती, सेंद्रिय व्यवस्थापन यांच्या जोडीला प्रक्रियेची जोड देत डाळी व हळद पावडर निर्मिती व्यवसाय आकारास आणला आहे. आपले कष्ट व उद्यमशीलता एवढ्यावरच न थांबवता ऊसशेती व त्या अनुषंगिक रसवंतीचा व्यवसायही यशस्वी केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील तेलगाव (ता. वसमत) येथील बालासाहेब राऊत यांची दोन ठिकाणी मिळून १० एकर शेती आहे. बोअरची व्यवस्था आहे. सुरुवातीपासून ठिबकद्वारे काटेकोर पाणी व्यवस्थापन करीत ऊस, भाजीपाला पिकांचे उत्पादन त्यांनी घेतले. एम.ए.(इतिहास) चे शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना जवळा बाजार येथील साखर कारखान्याच्या सेवेत ते रुजू झाले. परंतु नोकरीत मन रमत नव्हते. त्या वेळी पश्चिम महाराष्ट्रात आयोजित अभ्यास सहलीत ते सहभागी झाले. त्यात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रगतिशील शेतकऱ्यांचे प्रयोग अनुभवले. हीच प्रेरणा घेत नोकरी सोडून शेतीत करियर करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी कुटुंबीय नाराज झाले. परंतु बालासाहेब निर्णयावर ठाम राहिले. शेतातच वास्तव्य करून शेती करू लागले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू असताना विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेपर्यंत पोचण्याचा त्यांचा प्रयत्न काहीसा अपयशी ठरला. त्यानंतर मात्र पूर्णवेळ शेतीवर लक्ष केंद्रित करून नंतर मागे वळून पाहिले नाही. शेतीतील सुधारणा
शेतकरी मेळावे, प्रदर्शने, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी डी. बी. काळे आदींच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान माहीत करून घेतले. त्यातून हळदीची गादीवाफा पद्धतीने लागवड. कपाशी लागवड पद्धतीत बदल. दीर्घ कालावधीच्या पिकांमध्ये कमी कालावधीची आंतरपिके. त्यातून बोनस उत्पन्न. दरवर्षी प्रत्येकी एक ते दीड एकरांत ऊस आणि हळद. एक एकर पपई. त्यात मिरची, वाल, कोथिंबीर, लसूण आदी पिके. खरिपात मूग, उडीद, तूर तर रब्बीत हरभरा. सोयाबीनमध्ये तिळाचे मिश्र पीक. कृषी विभागाच्या पारंपरिक कृषी प्रकल्पांतर्गंत एक हेक्टर शेती सेंद्रिय पध्दतीने. प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल
कच्च्या मालावर प्रक्रिया वा मूल्यवर्धन केल्यास अधिक फायदा होतो ही बाब लक्षात आली. साडेआठ हजार रुपयांची छोटी मिल खरेदी करून आता मूग, उडीद, तूर डाळ तयार केली जाते. दगडी जात्यावर हरभरा डाळीची निर्मिती होते. तूर व हरभरा दरवर्षी प्रत्येकी १० क्विंटल तर अन्य डाळींची दोन क्विंटलपर्यंत विक्री. प्रति क्विंटलमागे सुमारे ७० ते ७५ क्विंटल डाळ मिळते. राऊत सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहेत. ते वसमत येथील गिरणीवरून दरवर्षी एक क्विंटल हळकुंडापासून पावडर तयार करून घेतात. वसमत - परभणी राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली जमीन थेट विक्रीसाठी जमेची बाजू ठरली आहे. रस्त्यालगत सुरू केलेल्या रसवंतिगृहातून डाळी, ताजा भाजीपाला, पपईचीही विक्री होते. १२० ग्राहकांचा व्हॉटसॲप ग्रूप. त्या माध्यमातून ग्राहकांची मागणी समजून त्यानुसार पुरवठा. कृषी प्रदर्शने, शेतकरी मेळाव्यांमधून दररोजची चार ते पाच हजार रुपयांपर्यंतची विक्री. डाळी, हळद पावडरचे २५० ग्रॅम ते एक किलोपर्यंत पॅकिंग. मूग,उडीद, डाळीची १२० रुपये प्रति किलो दराने तर हरभरा, तूर डाळीची ९५ ते १०० रुपये दराने विक्री. हळद पावडरीचा दर प्रति किलो २६० रुपये. पाणीटंचाईमुळे उसाचे क्षेत्र कमी केले. कारखान्याकडे ऊस देणेही जिकिरीचे झाले. आता पाच वर्षांपासून ऊस रसवंतीगृह सुरू केले आहे. तत्पूर्वी विविध रसवंती चालकांच्या भेटी घेऊन व्यवसायातील बारकावे, संधी, जोखीमांचा अभ्यास केला. रसनिर्मितीसाठी योग्य ६२०० या वाणाची एक डोळा पद्धतीने लागवड होते. गुणवत्तेच्या बर्फाचा वापर करण्याबरोबर लिंबू, आले, तुळशी, पुदिना आदी फ्लेवरमध्ये ग्राहकांच्या पसंतीनुसार रस उपलब्ध केला जातो. रसनिर्मितीत स्वच्छतेला महत्त्व दिले जाते. या रस्त्यावरील नियमित प्रवासी रसवंतीच्या ठिकाणी थांबून शेतातील नैसर्गिक वातावरणात मधुर रसाचा आस्वाद घेताना दिसतात. रसवंतीगृहाचा हंगाम ऑक्टोबर ते जून असतो. प्रति ग्लास १५ रुपये दराने हंगामात दररोज १०० ते १५० ग्लास रसाची विक्री होते. पिण्यासाठी आर.ओ.चे शुध्द पाणी कुटुंबासाठी बैठकीची वेगळी व्यवस्था मुलांना खेळण्यासाठी साधने सैनिक व अपंगांसाठी मोफत सेवा राऊत यांनी ग्राहकांच्या ‘फीडबॅक’ची व्यवस्था ठेवली आहे. एका ग्राहकाने दर्जेदार रसनिर्मितीसाठी स्टेनलेस स्टील यंत्र त्यांना सुचवले. त्याचे महत्त्व पटून ५० हजार रुपयांचे यंत्र नुकतेच घेतले आहे. त्याचे वजन कमी असून वाहतूकीसाठी ते सोपे आहे. साखरपुडा, लग्न, वाढदिवस आदी समारंभामध्ये रसाच्या ऑर्डर्स घेता येत आहेत. राऊत यांना पत्नी सिंधू यांची मोठी मदत मिळते. घरकाम सांभाळून त्या शेती, डाळ निर्मिती, पॅकिंग आदीं कामे करतात. शेती, प्रक्रिया व मूल्यवर्धनातून दोन मजली पक्के घर बांधले आहे. मुलगी गौरी पदवीचे शिक्षण तर मुलगा मंगेश दहावीला आहे. आगामी काळात कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा मानस आहे. काही वर्षांपूर्वी ठिबकद्वारे काटेकोर पाणी व्यवस्थापन केलेल्या राऊत यांचा महाराष्ट्र सिंचन सहयोग परिषदेतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. संपर्क- बाळासाहेब राऊत - ८२७५९४९६७९