कर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे करा

कर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे करा
कर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे करा

सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ दिली. शिवाय त्याची व्याप्तीही वाढवली. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. पण अद्यापही कोणी अर्ज भरला नसेल आणि ऑनलाइन मुदत संपली असली, तरी तालुका स्तरावरील सहायक निबंधकांकडे अर्ज करावा, जोपर्यंत पात्र शेतकरी येतील, तोपर्यंत ही योजना चालूच राहील,’’ असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

श्री. देशमुख यांनी सोमवारी (ता. १८) येथे पत्रकारांना केंद्र शासनाला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शासनाच्या विविध विकासकामांची माहिती दिली. श्री. देशमुख म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे. सामान्य माणसांच्या गरजा लक्षात घेऊन काम केले आहे. प्रत्येक योजनेचा, अभियानाचा पद्धतशीर आराखडा आखून कामे केली. त्यामुळेच आज एका नव्या दिशेने देश चालल्याचे आपल्याला दिसते. देश बदलणे ही एक प्रक्रिया आहे, ती एका दिवसात होऊ शकणार नाही. त्याला वेळ लागेल, आता त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जीएसटी किंवा डिजिटलायझेशन हे या टप्प्यातील महत्त्वाचे निर्णय आहेत. त्याचे परिणाम दिसू लागतील.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कर्जमाफी योजना आणली. त्यासाठी अजूनही वेळ गेलेला नाही. राहिलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून यंदा केंद्राने कृषीसाठी ११ लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले. शेतीमालाच्या बाजारपेठेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने दोन हजार कोटी रुपयांचा निधी ठेवला आहे. डाळींच्या बफर स्टॉकची मर्यादा दीड लाख टनांवरून २० लाखांवर वाढवली आहे. त्याशिवाय २८.५ लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. ई-नामच्या माध्यमातून ५८५ मार्केट विकसित करण्यात आली आहेत. जवळपास ८७ लाख ५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी त्यासाठी झालेली आहे, असेही श्री. देशमुख म्हणाले.

`बाजार समिती, डीसीसीच्या कारवाईत माझा संबंध नाही` सोलापूर बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांवर कारवाई आणि जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीच्या प्रश्‍नावर सहकारमंत्री देशमुख यांनी यात थेट माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करून बाजार समितीचे तक्रारदार तत्कालीन काँग्रेसचे नेतेच आहेत. त्या तक्रारीवर आता कारवाई झाली इतकंच आणि जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बरखास्ती मी नव्हे, रिझर्व्ह बॅंकेच्या शिफारशीनुसार झाली आहे. मी कधीही सुडाचे राजकारण केलेले नाही. त्यामुळे या दोन्ही विषयांशी माझा संबंध नाही, असेही मंत्री देशमुख म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com