राज्यातील वनौषधीधारकांचे अनुदान रखडले

राज्यातील वनौषधीधारकांचे अनुदान रखडले
राज्यातील वनौषधीधारकांचे अनुदान रखडले

नागपूर : राज्यात 2014-15 या वर्षात सुमारे 600 हेक्‍टर क्षेत्रावर वनौषधीची लागवड होती. परंतु अनुदान न मिळाल्याने हे क्षेत्र दुसऱ्या वर्षी निम्म्यावर आले आहे. महाराष्ट्र फलोत्पादन व वनौषधी मंडळ असेपर्यंत राज्यातील वनौषधी उत्पादकांना मिळणारे अनुदान आयुष्य मंडळाच्या स्थापनेनंतर मात्र मिळणे बंद झाल्याने वनौषधी उत्पादकांमध्ये रोष आहे.

पारंपरिक पिकाच्या तुलनेत जास्त पैसे मिळत असल्याने राज्यातील शेतकरी सफेद मुसळी, लेंडीपिंपळी, अश्‍वगंध यांसारख्या पिकांकडे वळले होते. अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत वनौषधीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे. अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) येथे वनौषधी खरेदी विक्रीची बाजारपेठही या तीन जिल्ह्यांकरिता विकसित झाली होती. दिल्ली येथील आयुर्वेदिक औषधी निर्मात्या कंपन्यांकरिता येथूनच व्यापाऱ्यांद्वारे खरेदी होत होती. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला पैसाही मिळत होता. वनौषधी खरेदीदारांकडून अपेक्षित पैसे न मिळाल्यास शेतकरी ही तूट शासकीय अनुदानातून भरून काढत. त्यामुळे हे पीक राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले होते.

कृषी विभागामार्फत वनौषधी लागवड असलेल्या शेताचे सर्वेक्षण करून अनुदानाचा प्रस्ताव महाराष्ट्र फलोत्पादन व वनौषधी मंडळाला पाठविला जात होता. त्यानंतर या शेतकऱ्यांना लागवडीपोटी अनुदान मिळायचे. आता मात्र आयुष्य मंडळाच्या अखत्यारित अनुदानाचा विषय गेल्याने गेल्या दोन वर्षांपासून वनौषधी लागवडकर्त्या शेतकऱ्यांची अनुदानासाठी फरपट सुरू आहे. याचा फटका राज्यात सर्वाधिक 90 टक्‍के लागवड क्षेत्र असलेल्या अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे या संदर्भाने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेत त्यांच्यासमोर ही शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करण्यात आले. त्याचा काही एक उपयोग झाला नसल्याचे वनौषधी उत्पादक सांगतात. राज्यातील वनौषधी उत्पादक जिल्हे व क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) ठाणे ः 2.5, जळगाव ः 1.65, सातारा ः 5, जालना ः 1, लातूर ः 5.13, उस्मानाबाद ः 17.6, अकोला ः 186.6, अमरावती ः 267.2, बुलडाणा ः 48.49, यवतमाळ ः 2.1, वर्धा ः 10, नागपूर ः 48.9, चंद्रपूर ः 2.38, भंडारा ः 0.52, एकूण ः 599.07 (सफेद मुसळीकरिता अनुदान ः 1 लाख 10 हजार रुपये/हेक्‍टरी )  

राज्याचे आयुष्य मंडळ केंद्रीय मंडळाच्या बैठकीत आपल्या भागातील वनौषधी लागवडीचे सादरीकरण करून अनुदानाची मागणी नोंदवितात. परंतु या वेळी महाराष्ट्राचा एकही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हता, असे ऐकले आहे. गेल्या वर्षी राज्याचे आयुष्य मंडळ स्थापण्यास वेळ लागला. या कारणांमुळे दोन्ही वर्षी शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले. यापुढील काळात तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळावे याकरिता खबरदारी घेण्याची गरज आहे. - विजय लाडोळे , वनौषधी अभ्यासक, अंजनगावसुर्जी, जि. अमरावती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com