शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह जपली उद्यमशीलता

धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व शेखर विठ्ठल चौधरी या दोघा भावांनी परिश्रम, उद्यमशीलता व प्रयोगशीलतेच्या जोरावर फळबागेला रोपवाटिकेची जोड दिली आहे.
Modern nursery developed by Chaudhary brothers
Modern nursery developed by Chaudhary brothers

धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व शेखर विठ्ठल चौधरी या दोघा भावांनी परिश्रम, उद्यमशीलता व प्रयोगशीलतेच्या जोरावर फळबागेला रोपवाटिकेची जोड दिली आहे. शेतीसह या उद्योगातून उत्तम आर्थिक प्राप्ती करणे त्यांना शक्य झाले आहे. धुळे शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर फागणे गाव आहे. येथील उमेश व शेखर या चौधरी बंधूंनी विविध फळबागेतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.   अंजीर लागवड   चौधरी यांनी पुना फिग या अंजीर वाणाची लागवड केली. जीवामृत, शेणखताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीच्या आधारे उत्पादन घेतले. त्यातही यश मिळवले. पुढील वर्षी कागदी लिंबू आणि सरदार वाणाच्या पेरूची लागवड केली. या काळात परिसरातील शेतकऱ्यांकडून रोपांची मागणी होऊ लागली. ही संधी लक्षात  घेऊन सन २००६ मध्ये रोपवाटिका सुरू केली. पुढे फळपिकांबरोबरच मिरची, वांगे यांसारख्या फळभाज्यांचीही रोपे विकण्यास सुरवात केली. या काळात धुळे येथील कृषी महाविद्यालय व कृषी विभाग वेळोवेळी पाठीशी उभे राहिले. सुमारे २७ गुंठ्यांपासून झालेली सुरवात आज आठ एकर जागेत बहरली आहे. आज सुमारे १६ कामगार कायमस्वरूपी कार्यरत आहेत. साहजिकच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू राहण्यास मदत झाली आहे. या शिवाय शेकडो हंगामी कामगार वर्षभर कार्यरत असतात. जिज्ञासू, अभ्यासू वृत्ती  चौधरी यांनी जिज्ञासा, अभ्यासू वृत्तीतून अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन त्यांची शेती पद्धती अभ्यासली. त्यांच्या व्यवस्थापन पद्धतीतील जमेच्या बाबी व त्रुटी जाणून घेतल्या. देशातील  काही विद्यापीठे, बंगळूर, कोडाईकॅनॉल आदी संशोधन केंद्रांना भेटी दिल्या. तेथील विविध फळे व त्यांच्या विविध जातींबद्दल तसेच लागवड व्यवस्थापनाविषयी प्रत्यक्षपणे जाणून घेतले. आजही चौधरी विविध संशोधन केंद्रांना भेट देत तेथील तंत्रज्ञान जाणून घेतात. केलेले प्रयोग

  • प्रयोगशीलतेच्या जोरावर  अन्ना, मायकेल, हिमाचल, प्रदेशातील  गोल्डन डेलीशीयस, कोडाइकॅनॉल येथील केकेएल- १ या सफरचंदाच्या जातींची धुळे जिल्ह्यातील उष्ण वातावरणात लागवड करून दाखवली आहे. 
  • सघन पद्धतीने अंजीर घेऊन प्रति एकरी १० टनांपर्यंत उत्पादन शक्य करून दाखवले आहे. हे उत्पादन अजून वाढावे यासाठी प्रयोग सुरू आहेत.
  • सध्या ॲव्हॅकॅडो या फळावर तसेच फणसाच्या नऊ जातींवर काम ते करीत आहेत.  
  • तसेच रोपवाटिकेत तयार केलेल्या नव्या जातीच्या कलमांची चाचणी आपल्या शेतात घेतात. जातीची गुणवत्ता, उत्पादनक्षमता व तेथील वातावरणातील अनुकूलता यांचा स्वतःच्या शेतात पडताळा घेतल्यानंतर रोपे विक्रीसाठी  शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात येतात. 
  • पाणी व्यवस्थापन सुरवातीस गावातील पाणीटंचाईमुळे शेजारील गावातून पाईपलाईनद्वारे पाणी आणावे लागत असे. आता बोअरवेल, शेततळे अशा उपाययोजनांच्या आधारे पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. सिंचनापूर्वी पाण्याचा सामू व क्षारता हे घटक तपासले जातात. त्यानुसार आवश्यक क्षारतेचे पाणी दिले जाते. गुणवत्तापूर्वक पाण्यासाठी ‘आरओ फिल्टर प्लांट'' बसवला आहे. प्रशिक्षणानंतर शेडनेटला सुरवात

  • आपल्या जवळपास पाच एकरांतील शेतीत उमेश यांनी कापूस, ज्वारी, गहू पिकांचा सेंद्रिय पध्दतीचा अवलंब केला होता. 
  • सन २००३ मध्ये पुणे येथील उद्यानविद्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली. प्रशिक्षणात केलेल्या अभ्यासातून सन २००३ मध्ये २७ गुंठे क्षेत्रात शेडनेट उभारले. सर्वप्रथम त्यात डच गुलाब व लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीचे प्राथमिक तत्त्वावर उत्पादन सुरू केले. सुरवातीस या प्रकारच्या मिरचीस खानदेश भागात पुरेशी बाजारपेठ व दरही नव्हते. तरी देखील न डगमगता आत्मविश्वासाच्या जोरावर या अडचणींवर मात करून हे पीक यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. 
  • त्यातूनच रोपवाटिका उभारण्याची प्रेरणा मिळाली. हाती पुरेसे आर्थिक भांडवल उपलब्ध नसताना देखील घेतलेल्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनी भक्कम पाठिंबा दिला. त्यानंतर कर्ज घेऊन भांडवल उभारणी केली. 
  • विश्‍वास जपण्यासाठी कठोर मेहनत   रोपवाटिका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील मोक्याच्या ठिकाणी आहे. यामुळे राज्य परराज्यातील शेतकऱ्यांची रोपांना मागणी होत आहे. कृषी विषयातले शिक्षण नसतानाही दोघा भावांनी केवळ अभ्यास व ज्ञानातून आपली शेतीचा विकास केला आहे. समर्पण, उद्यमशीलता, मेहनती स्वभाव, प्रयोगशीलता, मनमिळाऊपणा हे गुण चौधरी बंधूंनी जपले आहेत. 

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शंकांचे निराकरण ते न थकता करतात. यातून अनेक शेतकरी त्यांच्याशी कायमस्वरुपी जोडले जात असल्याचे उमेश यांनी सांगितले. 
  • वर्षाकाठी सुमारे १० लाखांपर्यंत रोपांची निर्मिती व विक्रीसाठी प्रयत्न असतो. 
  • दरवर्षी साधारणतः ४०० ते ५०० रोपे प्रायोगिक तत्त्वावर ते शेतकऱ्यांना मोफत वाटतात. वेळोवेळी त्यांच्याकडून प्रतिसादही जाणून घेतात. 
  • प्रशासकीय सेवेतील उच्च पदावर कार्यरत एकनाथ डवले व अन्य प्रशासकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या शेतीला भेटी दिल्या आहेत. 
  • धुळे येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तेजस नंदवाळकर, अश्विनी पाटील व आशिष माळी यांनी आपल्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषिदूत म्हणून या ठिकाणी कार्यानुभव घेतला आहे. 
  • संपर्क : उमेश चौधरी, ९७६५१७९५२२, (लेखक कृषी विस्तार व संप्रेषण विभाग, कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत. )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com