धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व शेखर विठ्ठल चौधरी या दोघा भावांनी परिश्रम, उद्यमशीलता व प्रयोगशीलतेच्या जोरावर फळबागेला रोपवाटिकेची जोड दिली आहे. शेतीसह या उद्योगातून उत्तम आर्थिक प्राप्ती करणे त्यांना शक्य झाले आहे. धुळे शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर फागणे गाव आहे. येथील उमेश व शेखर या चौधरी बंधूंनी विविध फळबागेतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अंजीर लागवड चौधरी यांनी पुना फिग या अंजीर वाणाची लागवड केली. जीवामृत, शेणखताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीच्या आधारे उत्पादन घेतले. त्यातही यश मिळवले. पुढील वर्षी कागदी लिंबू आणि सरदार वाणाच्या पेरूची लागवड केली. या काळात परिसरातील शेतकऱ्यांकडून रोपांची मागणी होऊ लागली. ही संधी लक्षात घेऊन सन २००६ मध्ये रोपवाटिका सुरू केली. पुढे फळपिकांबरोबरच मिरची, वांगे यांसारख्या फळभाज्यांचीही रोपे विकण्यास सुरवात केली. या काळात धुळे येथील कृषी महाविद्यालय व कृषी विभाग वेळोवेळी पाठीशी उभे राहिले. सुमारे २७ गुंठ्यांपासून झालेली सुरवात आज आठ एकर जागेत बहरली आहे. आज सुमारे १६ कामगार कायमस्वरूपी कार्यरत आहेत. साहजिकच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू राहण्यास मदत झाली आहे. या शिवाय शेकडो हंगामी कामगार वर्षभर कार्यरत असतात. जिज्ञासू, अभ्यासू वृत्ती चौधरी यांनी जिज्ञासा, अभ्यासू वृत्तीतून अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन त्यांची शेती पद्धती अभ्यासली. त्यांच्या व्यवस्थापन पद्धतीतील जमेच्या बाबी व त्रुटी जाणून घेतल्या. देशातील काही विद्यापीठे, बंगळूर, कोडाईकॅनॉल आदी संशोधन केंद्रांना भेटी दिल्या. तेथील विविध फळे व त्यांच्या विविध जातींबद्दल तसेच लागवड व्यवस्थापनाविषयी प्रत्यक्षपणे जाणून घेतले. आजही चौधरी विविध संशोधन केंद्रांना भेट देत तेथील तंत्रज्ञान जाणून घेतात. केलेले प्रयोग
पाणी व्यवस्थापन सुरवातीस गावातील पाणीटंचाईमुळे शेजारील गावातून पाईपलाईनद्वारे पाणी आणावे लागत असे. आता बोअरवेल, शेततळे अशा उपाययोजनांच्या आधारे पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. सिंचनापूर्वी पाण्याचा सामू व क्षारता हे घटक तपासले जातात. त्यानुसार आवश्यक क्षारतेचे पाणी दिले जाते. गुणवत्तापूर्वक पाण्यासाठी ‘आरओ फिल्टर प्लांट'' बसवला आहे. प्रशिक्षणानंतर शेडनेटला सुरवात
विश्वास जपण्यासाठी कठोर मेहनत रोपवाटिका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील मोक्याच्या ठिकाणी आहे. यामुळे राज्य परराज्यातील शेतकऱ्यांची रोपांना मागणी होत आहे. कृषी विषयातले शिक्षण नसतानाही दोघा भावांनी केवळ अभ्यास व ज्ञानातून आपली शेतीचा विकास केला आहे. समर्पण, उद्यमशीलता, मेहनती स्वभाव, प्रयोगशीलता, मनमिळाऊपणा हे गुण चौधरी बंधूंनी जपले आहेत.
संपर्क : उमेश चौधरी, ९७६५१७९५२२, (लेखक कृषी विस्तार व संप्रेषण विभाग, कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत. )
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.