ताजा शेतमाल, कांदा विक्रीतून केंद्राईमाताची घौडदौड

पुणे शहरातून जवळ असलेल्या केंदूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील केंद्राईमाता शेतकरी उत्पादक कंपनीने ज्यूट बॅगांची निर्मिती, त्यानंतर सध्या कांदा, भाजीपाला यांची थेट विक्री सुरू केली आहे. यातून कंपनीने विक्री व्यवस्थेचा चांगला विस्तार केला आहे. याशिवाय सामाजिक, कृषी अशा विविध क्षेत्रात कंपनी झोकून देऊन काम करत आहे. हा आदर्श अन्य शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरू पाहत आहे.
in the lockdown company solds maximum quantity of onions, the family pack box of vegetables made by the company
in the lockdown company solds maximum quantity of onions, the family pack box of vegetables made by the company

पुणे शहरातून जवळ असलेल्या केंदूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील केंद्राईमाता शेतकरी उत्पादक कंपनीने ज्यूट बॅगांची निर्मिती, त्यानंतर सध्या कांदा, भाजीपाला यांची थेट विक्री सुरू केली आहे. यातून कंपनीने विक्री व्यवस्थेचा चांगला विस्तार केला आहे. याशिवाय सामाजिक, कृषी अशा विविध क्षेत्रात कंपनी झोकून देऊन काम करत आहे. हा आदर्श अन्य शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरू पाहत आहे. पुणे जिल्हयात शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्यात असलेले केंदूर हे पंधरा हजार लोकवस्तीचे १२ वाड्यांवस्त्यांमध्ये विखुरलेले गाव आहे. गावाचा बहुतांशी भाग जिरायत असून मूग, बाजरी, कडधान्ये व भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. गावात सर्वाधिक क्षेत्र कांदा पिकाखाली आहे. स्वीटकॉर्न ५०० हेक्टर, खरीपात मूग ९००-१००० हेक्टर, बाजरी ११०० हेक्टर, रब्बी ज्वारी ६०० हेक्टर, गहू २०० हेक्टर, भाजीपाला ५०० ते ६०० हेक्टर अशा पिके घेतली जातात. कांदा लागवडीसाठी ओळख गावात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात ६० ते ७० टक्के क्षेत्रावर व सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कांद्याची दरवर्षी लागवड होते. शेतकरी साधारणपणे एकरी दहा ते बारा टन उत्पादन घेतात. सध्या कांद्याची गावातीलच केंद्राईमाता शेतकरी कंपनीमार्फत विक्री केली जात आहे. त्यातून चांगला दर मिळण्यास मदत होत आहे. गावातील पिकांचे क्षेत्र लक्षात या कंपनीने १८ लाख रूपयांचा व्यवसाय आराखडा तयार केला. कंपनीने ज्यूट बॅगांची निर्मितीही सुरू केली आहे. लॉकडाऊमध्ये ताजा शेतमाल विक्री सध्या लॉकडाऊन असल्याने शहरातील नागरिकांना भाजीपाला पुरवठा करण्यासाठी देखील केंद्राईमाता कंपनीने आघाडी घेतली आहे. त्यासाठी ‘फॅमिली पॅक' तयार केला आहे. सुमारे १५० हून अधिक शेतकऱ्यांकडून हा भाजीपाला उपलब्ध होत आहे. ठरविलेल्या दराने खरेदी केली केल्यानंतर त्याची कंपनीस्थळी पाण्याद्वारे स्वच्छता करून प्रतवारी होते. त्यानंतर माल बाँक्समध्ये भरला जातो. कमीत कमी हाताळणी केल्यामुळे भाजीपाला ताजा राहतो. त्यामुळे ग्राहकांची प्रतिसाद वाढत आहे सध्या पुणे शहरातील वाकड, हिंजवडी, लोहगाव, मोशी, चिखली, वडगाव शेरी या परिसरात असलेल्या ३६ सहकारी निवासी सोसायट्यांमध्ये थेट विक्री होत आहे. झालेली विक्री

  • मागणीनुसार गरज भासेल त्यानुसार फळे, भाजीपाला, कडधान्ये खरेदी करुन मुंबई येथील आठवडे बाजार व निवासी सोसायट्यांमध्येही विक्री करीत आहे. आत्तापर्यत सुमारे २ हजार २०० हून अधिक फॅमिली पॅकची विक्री केली आहे. जवळपास ७०० क्विंटल भाजीपाला विक्री झाली आहे. फॅमिली पॅक बनविताना एका कुटूंबासाठी किमान एक आठवडा पुरेल एवढा भाजीपाला असावा हा उद्देश ठेवला आहे.
  • सुमारे १५ प्रकारचा माल असून दोन किलो कांदे, एक किलो बटाटे, एक किलो टोमॅटो, मिरची, लसूण, लिंबू, तसेच वेलवर्गीय भाज्या, फळवर्गीय व पालेभाज्या असा ३५० रूपयांचा हा पॅक आहे. साधारणपणे एक गाडीत शंभर बॉक्स बसतात. रोज दोन गाड्या भरून त्यांचे वितरण केले जाते. भाजीपाला विक्री करताना आरोग्याची काळजी घेतली जाते. यात भाजीपाला काढणी करताना हॅन्ड ग्लोज, तोंडाला मास्क, भाजीपाला भरताना, पॅकिंग करताना सॅनिटायझरचा वापर केला जातो. ग्राहकांना रांगेत सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगून विक्री केली जाते.
  • शंभर टनाहून अधिक कांद्याची विक्री गावात दीड ते दोन महिन्यापासून कांद्याची काढणी सुरू आहे. त्याची खरेदी करून लॉकडाऊनच्या काळात रायगड, अलिबाग, महाबळेश्वर, पेण येथे साधारणपणे प्रति किलो १३ ते १४ रूपये दराने कंपनीने आत्तापर्यत जवळपास १०० टन विक्री केली आहे. याशिवाय परराज्यातही कोईमतूर व वेल्लोर येथे २५ टन विक्री १७ ते १८ रूपये दराने झाली आहे. त्यामुळे कंपनीला चांगला नफा मिळाला आहे. कंपनीची लॉकडाऊनच्या काळात सव्वा महिन्यात सुमारे ३० लाखांहून अधिक उलाढाल झाली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. विधायक उपक्रम कृषी विभागामार्फत गावातील शेतकरी कंपनीतील वेगवेगळ्या गटातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य,तृनधान्य खरीप मूग, बाजरी पिकांचे प्रात्यक्षिके, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा या पिकांसाठी मोफत बियाणे, खते, कीडनाशके यांचे वाटप करण्यात येते. वृक्ष लागवड व माती परिक्षण असे विविध उपक्रमही गावात राबविले जातात. आयटीसी- अफार्म मार्फत मिशन सुनहरा कल या कार्यक्रमांतर्गत पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबविला. त्यामध्ये ४६८ हेक्टर वर समपातळी चर, दगडी बंधारे ,बांधबंदिस्ती, फळ लागवड, मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे, शेततळी अशी अनेक कामे राबविण्यात आली. आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना १०० एकरांवर कांदा पीक प्रात्यक्षिक व ९५ एकरांवर स्वीटकॉर्न प्रात्यक्षिके राबविले. शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन, अभ्यास दौरे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. परिसरातील ५०० शेतकऱ्यांना मोफत झाड वाटप झाले आहे. भविष्यातील योजना

  • कांद्यावर प्रक्रिया करणे.
  • कांदा चाळी उभारणे.
  • कांदा निर्यात करणे
  • कांदा बियाणे निर्माण करून शेतकऱ्यांना पुरविणे.
  • कांदा विक्रीसाठी परराज्यात केंद्र सुरू करणे.
  • संपर्क- संदीप सुक्रे ९०११९९९७७६ व्यवस्थापकीय संचालक, केंद्राई माता अशिष गाडगे ७०३८७०४८६८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com