औरंगाबाद जिल्ह्यातील मात्र जालना जिल्ह्याच्या सीमेलगत डोंगरांच्या कुशीत वसलेलं कोनेवाडी हे बदल स्वीकारून प्रगतीसाठी धडपडणारं गाव आहे. शेती, पूरक उद्योग, विक्री व्यवस्था, पीक पद्धतीत सुधारणा करीत गावानं विकासाला चालना दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे १३०० लोकसंख्येच्या कोनेवाडी गावाचे लागवडीलायक क्षेत्र जवळपास ३८२ हेक्टर आहे. वनाखालील क्षेत्र १७५ हेक्टर आहे. कपाशी, बाजरी, तूर ही गावची प्रमुख पारंपरिक पिके आहेत. अलीकडील वर्षांत सोयाबीन, मका, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आदी पिके शेतकरी घेतात. काही शेतकरी १९८५ पासून कांदा व अन्य भाजीपाला बीजोत्पादनातही काम करतात. गावातील शेती दृष्टिक्षेपात
वृक्षलागवड, जलसंधारण डोंगरांवर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षलागवड केली जात आहे. पाणलोट विकासकामांमधून गावालगतच्या ओढ्यांवर ३० माती व सिमेंट बंधारे झाले. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढून हंगामी सिंचनाची सोय झाली. कपाशीसह बहुतांश पिके सूक्ष्म सिंचनाखाली आली आहेत. दहा शेततळ्यांद्वारे शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायावर भर दिला आहे. काहींचे मासे विक्रीसाठी तयार आहेत. पूरक उद्योगाची धरली कास काही वर्षांपूर्वी गावातील प्रत्येक कुटुंबाकडे शेळी व मेंढी संगोपन व्हायचे. आता ते कमी करून दुग्ध व्यवसाय व परसबागेतील कुक्कुटपालनाची कास धरली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची ९५ टक्के संख्या असलेल्या कोनेवाडीत पूरक उद्योग गावाच्या अर्थकारणाला गतिमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. शेळीपालन
दूध संकलन
शेतीतील उपक्रमशीलता
कुक्कुटपालन
शेतकरी बाजार पणन मंडळामार्फतच्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराच्या आयोजनासाठी निसर्गराजा गटाने पाच वर्षांपासून पुढाकार घेतला आहे. हा गट औरंगाबाद शहरात आठवड्यातील तीन बाजारांत सहभाग घेतो. आजघडीला सुमारे १३ गट प्रत्यक्ष बाजारात सहभागी होत असल्याचे बाजाराचे आयोजक व निसर्ग राजा शेतकरी मंडळाचे प्रमुख विलास भेरे सांगतात. या गटाने लॉकडाउनमध्ये मार्च ते नोव्हेंबरपर्यंत सुमारे ५७ लाख रुपयांची उलाढाल थेट फळे व भाजीपाला विक्रीतून केली. शेतकरी उत्पादक कंपनी जानेवारी २०२० मध्ये गावात कोनेवाडी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली आहे. आसपासच्या गावांतील १८० शेतकरी त्यासोबत जोडले आहेत. पाचशे सभासद जोडण्याचे लक्ष आहे. कृषी निविष्ठा वाजवी दरात उपलब्ध करणे, शेळीपालन, दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन, त्यासाठी प्रशिक्षण- मार्गदर्शन, शेतीमालाची थेट विक्री, स्लॉटर हाउस उभारून बोकडाचे मांस उपलब्ध करणे आदी उद्दिष्टे ठेवून कंपनीचे कार्य सुरू आहे. प्रतिक्रिया सन १९८५ पासून सूर्यफूल, भोपळा, कांदा, मिरची, वांगी, कपाशी आदींचे बीजोत्पादन केले. आजमितीला आठ ते दहा शेतकरी या उपक्रमात सहभागी आहेत. — तुळशीराम भेरे, ९९२१७९२१३३ चार एकर शेतीला यंदा शेळीपालन, कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. सोळा मोठ्या शेळ्या व तेवढीच पिले आहेत. माझ्यासह पाच ते सहा शेतकऱ्यांनी तुतीची लागवडही केली आहे. — तानाजी भोसले आमची एकत्र कुटुंबाची १५ एकर शेती आहे. साडेअकरा एकर डाळिंब आहे. दोन शेततळी आहेत. धरण जवळ असल्याने विहिरीलाही पाणी बरे असते. नाशिक किंवा वाशी मार्केटला विक्री करतो.दोन वर्षांपूर्वी ८० रुपया प्रति किलोचा दर निर्यातक्षम डाळिंबाला दर मिळाला. — बाळाभाऊ भेरे
दहा शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रत्यक्ष पुणे दौरा करून थेट आठवडी बाजारांत विक्री व्यवस्थेला चालना दिली आहे. — गजानन वाघ उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, औरंगाबाद आम्हाला जमीन नाही. पूरक व्यवसाय एका शेळीपासून सुरू केला. आज २२ शेळ्या व ४० पिले आहेत. एका कोंबडीपासून सुरू केलेले कुक्कुटपालन ९० गावरान कोंबड्यांवर पोचले आहे. — कौशल्याबाई पाराजी बोरुडे तंत्रज्ञानाचा स्वीकार, आंतरपिकांना प्राधान्य, महोगनी वृक्षलागवड, बैलांचा व्यापार ही देखील गावची अन्य वैशिष्ट्ये आहेत. उद्योगी राहण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. — विलास भेरे, ८३७८०८३५७१ अध्यक्ष, निसर्ग राजा शेतकरी मंडळ ,
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.