कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व पर्यावरणपूरक अशी बिरुदावली मिरवली आहे. गावाच्या या वैभवात स्वच्छ परिसर, सुंदर रस्ते, दुतर्फा झाडे यांची भर पडते. एकदिलाने लोकसहभागातून प्रगतीचे नवे अध्याय गावाने साकारले आहेत. केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयानेही गावाची दखल घेतली आहे. नाशिक शहराजवळ कोटमगाव हे छोटेसं गाव. एके काळी एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या उभारणीमुळे जमिनी गेल्याने हे गाव प्रकल्पग्रस्त झालेले. ग्रामपंचायतीचे आर्थिक स्रोत मर्यादित असताना प्रतिकूल परिस्थितीत इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे दुर्दम्य इच्छाशक्तीतून गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून ग्रामविकास शक्य असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. तरुणाई पुढे सरसावली सन २०१० चा काळ. गावातील तरुणाई एकत्र आली. राज्यातील आदर्श गावांना भेटी देत ग्रामविकासाच्या संकल्पना त्यांनी समजून घेतल्या. चिमुकल्यांना सोबत घेऊन ‘स्वच्छतादूत’ संकल्पना राबवून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोचविला. लोकसहभागाची वज्रमूठ घट्ट होऊन विकासाचे अनेक टप्पे पार होत गेले. त्यामुळेच स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण व कृषी या क्षेत्रात गावाने गती साधली आहे. आपले हक्क मिळवले एकलहरे औष्णिक विद्युतनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांच्या १२५ हेक्टर बागायती शेतीचे भूसंपादन झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्याबदल्यात स्थानिकांना नोकरीचे आश्वासन देण्यात आले, पण लाभ मिळाला नव्हता. ग्रामस्थांनी शासनाकडे पाठपुरावा करून शंभर बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला. यासह संबंधित प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा वापर करून वीटनिर्मितीसाठी शेतकऱ्यांना २० टक्के आरक्षण मिळवले. त्यातून वीट निर्मिती उद्योग उभे राहिले. एकीकडे ग्रामपंचायतीचे उत्पन्न दोन लाखांच्याखाली असल्याने अनेक अडचणी होत्या. मात्र इच्छाशक्तीच्या बळावर येथील प्रत्येक घटक गावासाठी तन, मन, धनाने झपाटून काम करतो. यातूनच परिवर्तनाला चालना मिळाली आहे. शेतीत मिळवली ओळख गावाची मुख्य अर्थव्यवस्था पूर्वी शेतीवर अवलंबून होती. मात्र प्रकल्प भूसंपादनात अनेकजण भूमिहीन झाले. त्यामुळे मोलमजुरी हेच उदरनिर्वाहाचे साधन राहिले. ज्या जमिनी कसण्यायोग्य होत्या त्यात नवे प्रयोग करून त्या बागायती केल्या. आज ऊस व गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादनात गाव आघाडीवर आहे. नाशिक शहराची जवळ असलेली बाजारपेठ ही जमेची बाजू आहे. कांदा, कोबी फ्लॉवर, टोमॅटो यांच्या जोडीला सोयाबीन, गहू, भात ही हंगामी पिके घेतली जातात. यासह अल्पभूधारक व भूमिहीन घटक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुकूटपालनातून प्रगती साधत आहेत. त्यातून अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे. कृषी विकासासाठी पुढाकार- ठळक बाबी
लोकसहभाग हीच ताकद शासनाकडील निधी व लोकसहभागातून गावाच्या वैभवात भर घालणारी सुविधा युक्त २४०० चौरस फूट आकाराची दुमजली इमारत उभारली. आता कार्यालय इंटरनेट जोडणीसह संगणकीकृत आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, सभागृह, छोटे प्रतीक्षालय असून संपूर्ण कार्यालय सीसीटीव्ही निगराणीखाली आहे. सरपंच बाळकृष्ण म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी, ग्रामसेवक बालासाहेब कदम, आरोग्य कामासाठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षक असे सर्वांचे सहकार्य लाभते. सरपंच आपल्याकडील उपलब्ध साधने विकासासाठी मोफत उपलब्ध करून देतात. विकासातील ठळक बाबी
निरोगी आरोग्यासाठी पुढाकार आरोग्य हा महत्त्वाचा विषय असल्याने वैद्यकीय संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी ईसीजी, हिमोग्लोबीन, मोतीबिंदूसह आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन होते. गरजू व निराधार घटकांच्या मोफत शस्त्रक्रिया होतात. प्रत्येकाच्या रक्तगटाची नोंद करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी अल्पदरात एटीएम पद्धतीचे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविले आहे. वापरानंतर योग्य विल्हेवाट लावण्यासाठीही यंत्र बसवले आहे. गरोदर माता संगोपन कार्यक्रमातून वेळोवेळी मार्गदर्शन होते. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी गावाच्या मध्यवस्तीत सामूहिक सॅनिटायझर व हात धुण्याची व्यवस्था आहे.
स्वच्छ सुंदर गावासाठी पुढाकार
दृष्टिक्षेपात कोटमगाव
सन्मान
संपर्क- बाळकृष्ण म्हस्के, ९८२२०७७५१७ (सरपंच) बालासाहेब कदम, ९४०३१६४०१२ (ग्रामसेवक)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.