शेततळे, द्राक्षबागेमध्ये सोनी गावाने बनविली ओळख

शासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोहोचली तर त्यातून निश्चितपणे ग्राम परिवर्तन होते. शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे‘ या योजनेचा लाभ सोनी (ता. मिरज,जि. सांगली) गावातील शेतकऱ्यांनी घेतला.
Agriculture officer while giving information about new grape cultivation
Agriculture officer while giving information about new grape cultivation

शासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोहोचली तर त्यातून निश्चितपणे ग्राम परिवर्तन होते. शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे‘ या योजनेचा लाभ सोनी (ता. मिरज,जि. सांगली) गावातील शेतकऱ्यांनी घेतला. आजअखेर या गावामध्ये २८८ शेततळी आहेत. संरक्षित पाणी उपलब्धतेमुळे गावशिवारात द्राक्ष बाग फुलल्या. देशभरातील बाजारपेठेत ‘सोनी द्राक्ष' या ब्रॅंडने गावातील द्राक्षांची विक्री होते. मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर भोसे फाट्यापासून पाच किलोमीटर अंतरावर सोनी हे गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ७,२५० इतकी आहे. खातेदारांची संख्या २,०१८ आहे. भौगोलिक क्षेत्र १,९२० हेक्टर आहे. गावाचे पर्जन्यमान पाचशे ते साडेपाचशे मिलिमीटर इतके आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक गावांप्रमाणेच सिंचनासाठी पाण्याची कमतरता या गावामध्येही होती. कोरडवाहू भाग असल्याने येथील शेतकऱ्याला आर्थिक सक्षम होण्यावर मर्यादा असतात. मिरज तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पूर्व भागात पाणी टंचाई आणि पश्चिम भागात कृष्णा आणि वारणा नदीमुळे  बागायती भाग पहायला मिळतो. सोनी गाव शिवारात नदी नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर हंगामी पिकांची लागवड ठरलेली. परंतु प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावशिवारात द्राक्षासारखे पीक रूजविले. गावामध्ये १९८० पासून थॉमसन सीडलेस द्राक्ष लागवडीस सुरवात झाली. पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी होती. बागेला टॅंकरने पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ही परिस्थिती बदलणे अत्यंत गरजेचे होते. वीस ते बावीस वर्षापूर्वी गावातील युवक औद्योगिक वसाहतीत काम करायचे. मात्र आता द्राक्ष पिकाने गावातील तरुण शेतीकडे वळाले. शाश्वत पाण्यासाठी शेतकरी एकत्र आले. शेतकरी आले एकत्र  गावात टप्याटप्याने द्राक्ष बागा वाढू लागल्या.मात्र पाणी टंचाई काही सुटली नाही.  दर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यातच दुष्काळामुळे द्राक्ष बागांचे प्रमाण कमी होण्यास सुरवात झाली. सन २०१० मध्ये गावातील  शेतकरी एकत्र आले. गावापासून काही अंतरावर असलेल्या मालगाव, कवठेएकंद, हरोली या गावातून पाणी आणण्याचा विचार सुरु केला. त्यानुसार गावातील दहा-बारा शेतकऱ्यांचा एक गट करून स्वखर्चाने पाइपलाइन करून शिवारात पाणी आणले. हळू हळू शाश्वत पाण्याची सोय होऊ लागली. द्राक्ष शेतीला शेततळ्याचा आधार ‘मागेल त्याला शेततळे‘ ही योजना गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचताच,या योजनेचा शेतकऱ्यांनी अभ्यास केला. शेततळ्यामुळे शाश्वत पाण्याची सोय होते, आणि याला अनुदानही मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळी घेण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये या गावात उच्चांकी संख्येने शेततळी मंजूर केली. फळबागेकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेत पाणीसाठा केला. त्यामुले गावामध्ये द्राक्षबाग आणि उसाचे क्षेत्र वाढले.  शासनाच्या अनुदानातून सोनी गावातील शेतकऱ्यांनी २८८ शेततळी घेतली आहेत. या गावात द्राक्ष बागायतीमुळे आर्थिक समृद्धी येऊ लागली आहे. संपूर्ण द्राक्ष शेतीला शेततळ्याचा आधार मिळाला आहे. सोनी गाव झाले द्राक्षांचा ब्रॅण्ड 

  • सातत्यपूर्ण उत्तम दर्जा, पॅकेजिंग यामुळे खास ओळख.
  • मुंबईसह दिल्ली, कोलकता, चेन्नई, बंगळूरू येथील व्यापाऱ्यांकडून खरेदी. आखाती देश तसेच युरोप बाजारपेठेतही निर्यात.
  • अधिक गोडवा, लांब,अधिक फुगवण असलेली द्राक्षे घड.
  • द्राक्ष मणी कुरकुरीत, पाच ते सहा दिवस सहजपणे टिकतात.
  • शेतातून होत असलेल्या थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ. 
  • पीक लागवड क्षेत्र 

    पीक क्षेत्र
    द्राक्ष ६२० हेक्टर
    ऊस ५१ हेक्टर

    खरीप, रब्बीमध्ये हंगामी पिकांची लागवड. यांत्रिकीकरण  उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान -  ८५ ट्रॅक्टर, २५ ब्लोअर  आणि विविध अवजारे शेततळ्यांची संख्या 

  • सामुहिक शेततळी ः ३२
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना ः १५
  • एकात्मिक कडधान्य योजना ः ०७
  • मागेल त्याला शेततळे ः २३४
  • एकूण शेततळी ः २८८
  • बंधाऱ्यांची कामे 

  • संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ः ५
  • गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम ः ६
  • साखळी बंधारे ः १०
  • विशेष घटक योजना ः १
  • एकूण ः २२ बंधारे
  • जलयुक्त शिवारामुळे पाणी पातळीत वाढ कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शेततळे योजनांची माहिती  पोहोचविण्यात आली. २०१५-१६ मध्ये शासनाने जलयुक्त शिवार योजना जाहीर केली. शासनाच्या निकषानुसार हे गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट झाले. पूर्वी गावात शासनाच्या माध्यमातून बंधारे बांधण्यात आले होते. त्यामध्ये गाळ साचला होता. लोकसहभागातून सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडिंग, सिमेंट नाला बांधामधील गाळ काढण्याचे काम झाले. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. म्हैसाळचे पाणी आले शिवारात म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही दुष्काळी पट्ट्यासाठी वरदान ठरली आहे. सोनी गावशिवारामध्ये म्हैसाळचे पाणी येते. दरम्यान, सन २०१७ मध्ये डोंगरवाडी ही योजना सुरु झाली. म्हैसाळचे पाणी खंडेराजूरीतील ब्रह्मनाळ तलावात येते. तेथून १८ किलोमीटर करोली या गावात सायफनद्वारे येते. तेथून सोनी गावात बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी येते. शिवारात प्रत्येक ठिकाणी व्हॉल्व्ह आहेत. प्रत्येक व्हॉल्व्हवर २८ ते ३० हेक्टर क्षेत्र आहे. त्याठिकाणाहून शेतकऱ्यांनी स्वतःची पाइपलाइन करून शेततळ्यात पाणी सोडले आहे. आवर्तन सुरु झाले की, शेततळी भरून घेतली जातात. या योजनेची वार्षिक पाणीपट्टी प्रति हेक्टरी १५ ते १६ हजार रुपये आहे. मी नौसेनेमध्ये नोकरी करत होतो. निवृत्त झाल्यानंतर गावी आलो. शेती करू लागलो. शेततळी, जलयुक्त शिवार आणि म्हैसाळ योजनेचे शिवारात आलेल्या  पाण्यामुळे गावातील शेतीचे चित्र बदलले. शाश्वत पाण्याची सोय झाल्याने नव्याने द्राक्ष बाग लावली आहे. — दीपक चव्हाण, द्राक्ष बागायतदार. आमची कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. आर्थिक उत्पन्नासाठी मी रोजगार हमीवर काम केले. मी जिद्द सोडली नाही. कृषी विभागाच्या शासकीय योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या. गेल्या काही वर्षात शेतशिवारात विविध कामे झाली आहेत. आता आमचे शिवार हिरवेगार झाले आहे. द्राक्ष शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रगती झाली आहे. — श्रीकांत जाधव,  द्राक्ष बागायतदार कृषी विभागाच्या प्रत्येक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. गावातील शेतकरी, लोकप्रतिनिधी यांचे मोठे सहकार्य मिळते. शासकीय योजनेला गावातून मोठा प्रतिसाद मिळतो. गेल्या तीन वर्षांपूर्वी सोनी गावात द्राक्षाचे क्षेत्र ३२० हेक्टर इतके होते. शेततळे, जलयुक्त शिवार योजनेतून गाळ काढणे यामुळे पाणी साठा झाल्याने तीन वर्षात द्राक्ष लागवड क्षेत्रामध्ये ३०० हेक्टरने भर पडली आहे.  — अभिजित कुलकर्णी, ९५११७६७३६४ (कृषी सहायक)  मी २०१२ ते १७ या कालावधीत जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून कार्यरत होतो. २०१३- १४ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे करत असताना शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील त्यादृष्टीने प्रयत्न केला. शासनाच्या विविध योजना, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये लोकसहभागही चांगला मिळाला. कृषी विभागाच्या असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे यासारख्या योजना प्रभावीपणे राबविल्याने गावातील शेतीला फायदा झाला. म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने द्राक्ष लागवड क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे.   — राजेंद्र माळी, (सरपंच) ९७६५३९९४०९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com