दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेती

हळदीचे जोमदार पीक
हळदीचे जोमदार पीक

अमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व मीलन नवीनचंद्र शाह या बालमित्रांनी धार (ता. अमळनेर) येथील आपल्या ५० एकर शेतीत दुष्काळाशी सतत लढा देऊन हळद पिकाचे अतिशय उत्तम व्यवस्थापन केले आहे. पाण्याची कमी उपलब्धता लक्षात घेऊन भरउन्हाळ्यातील लागवड टाळून पावसाळ्यात लागवडीचे नियोजन साध्य केले जाते. आठ वर्षांत त्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी १०० क्विंटल (ओले) तर वाळवलेल्या हळदीचे २५ क्विंटल अशी उत्पादन क्षमता टिकवली आहे.  

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अश्पाक मुनीर पिंजारी यांनी गेल्या आठ वर्षांत हळद शेतीत चांगले नाव कमावले आहे. मीलन नवीनचंद्र शाह हे त्यांचे शेतीतील भागीदार आहेत. दोघेही शाळेपासूनचे मित्र आहेत. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात त्यांनी सोबतच विज्ञान विषयातील पदवी संपादन केली. अश्पाक यांचे वडील वन विभागात अधिकारी होते. तर मीलन यांचे वडील अमळनेरातील कारखान्यात उच्चपदावर कार्यरत होते. दोघांकडे शेती नव्हती; पण आवड होती. त्यातून १९९२ मध्ये अमळनेरपासून तीन किलोमीटरवर असलेल्या धार येथील शिवारात ४० एकर शेती घेतली. त्यात जुनी विहीर होती. तिला सुरवातीला बऱ्यापैकी पाणी होते. त्यामुळे हिरवी मिरची, काकडी, गिलके, दोडके यांची शेती करायला सुरवात केली. ही शेती सुरवातीचे दोन हंगाम परवडली. परंतु अनेकदा बाजारात आवक अधिक असली तर दर पडायचे व नुकसान व्हायचे. याच वेळी पाण्याचे संकटही वाढू लागले. 

हळदीचा पर्याय निवडला    पाण्याचे संकट गडद होऊ लागले तशा १९९८ मध्ये आणखी दोन विहिरी खोदल्या. २००४ मध्ये खोल शेततळे तयार करून घेतले. सुरत (गुजरात) येथील बाजारात ते भाजीपाला पाठवायचे. २००४ मध्ये गारपीट झाली. त्यात १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. मग गारपिटीत नुकसानीची शक्‍यता कमी असलेल्या पिकाचा शोध घेतला. मग हळद पिकाचा पर्याय सापडला. त्यातून २००४ मध्ये हळदीची शेती सुरू केली. सुरवातीला चार क्विंटल बियाणे आणले होते. त्यातून पुढील वर्षी उत्पादन घेत बेणे उपलब्ध करण्यास सुरवात केली. 

पाण्याचे नियोजन  सात-आठ वर्षांपासून पिंजारी १०-१२ एकरांत हळद लागवड करतात. यातील तीन-चार एकर लागवड पूर्वहंगामी तर उर्वरित जुलैमध्ये असते. याचे कारण म्हणजे पावसाळा ठीक असला तर जुलैमध्ये लागवड करताना पाण्याची तेवढी गरज नसते. तीन विहिरी आहेत. मात्र पाणी फक्त दीड इंची आहे. एका विहिरीत जलसाठा करण्यात येतो. साधारण दिवसाला २० मिनिटे पाणी पिकाला देण्यात येते. जमिनीचा कस कायम राहावा यासाठी पीक अवशेषांचा भरपूर वापर केला जातो. यात पूर्वहंगामी लागवड झाल्यानंतर पाणी दिले जाते. त्याच वेळी हे अवशेष जमिनीला दिले जातात. पिंजारी यांनी दगडी विहीर खोदली आहे. ती सुमारे दीड लाख लिटर क्षमतेची आहे. बोअरचे पाणी त्यात घेण्यात येते. दगडी असल्याने त्यातून पाणी झिरपण्याची प्रक्रिया अत्यंत कमी होते.  

लागवडीतील प्रयोग  लागवडीसाठी वेगवेगळे प्रयोग सतत केले जातात. अडीच फुटाच्या गादीवाफ्यावर दोन ओळी असतात. दोन गादीवाफ्यांमधील अंतर चार फूट असते. तर पाच फुटांच्या गादीवाफ्यावर हळदीच्या तीन ओळी असतात. त्यात ठिबकच्या दोन लॅटरल असतात. यंदाच्या हंगामातही अत्यंत कमी पाणी असताना १५ एकरांत हळद फुलविण्याचे नियोजन केले. दोन एकर लागवड पूर्ण केली असून, उर्वरित लागवड जुलैमध्ये होईल. सध्या १० मिनिटे प्रतिदिन पद्धतीने पाणी देण्यात येत आहे.

एकरी उत्पादनात सातत्य  सेलम हेच वाण असते. गेल्या आठ वर्षांपासून एकरी १०० क्विंटल (ओली) व सुकवून २५ क्विंटल अशी हळदीची उत्पादकता ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. एकेवर्षी एकरी २७० क्विंटल ओली व ५३ क्विंटल वाळवलेली असे उत्पादनही त्यांनी साध्य केले आहे. उत्पादन खर्च एकरी ९० हजार रुपयांपर्यंत येतो.

हळदीची साठवणूक  देशभरात दिवाळीनंतर सुरू होणारा हंगाम लक्षात घेता हळदीची साठवणूक दिवाळीपर्यंत कोल्ड स्टोरेज व धार येथील गोदामात होते. धार येथे एक हजार क्विंटल साठवणूक क्षमतेचे गोदाम एका निकटवर्तीयाने उपलब्ध करून दिले आहे. हळद उकळण्यासाठी बॉयलरही आहे. पुढील काळात पावडरीचे तंत्रशुद्ध पद्धतीने पॅकिंग, ब्रॅंडिंग करून विक्री करण्याचे नियोजन आहे. शेतीत चार सालगडी व एक ट्रॅक्‍टरही आहे. अश्पाक व मीलन हे धुळे-अमळनेर मुख्य मार्गावर २००६ पासून हॉटेलही चालवीत आहेत. शेतीतील आर्थिक समस्या सोडवण्यासाठी हॉटेलमधील नफ्यातील निधी वापरण्यात येतो. 

विक्री व्यवस्था  मागील दोन वर्षे वाळविलेल्या हळदीला प्रतिक्विंटल सरासरी आठ हजार ते १२ हजार रुपये दर मिळाला. हळदीच्या विक्रीसाठी हिंगोली व नांदेडच्या बाजारपेठेला पसंती असते. चाळीसगाव येथील एका मसाले उत्पादकाला दरवर्षी आठ ते १० टन कोरड्या हळदीची विक्री करतात. दोन टन हळद पावडरीची विक्री जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, शिरपूर (जि.धुळे) येथील खरेदीदारांना होते. पावडरीला २०१७ मध्ये प्रतिकिलो सरासरी १२० रुपये तर मागील हंगामात हाच दर कमाल १४० रुपयांपर्यंत मिळाला. हळदीचा बाजार मार्च ते जूनपर्यंत तेजीत असतो. पावसाळ्यात पावडर तयार केली जात नाही. कारण प्रतिकूल वातावरणामुळे ती काळी पडते. 

- अश्पाक पिंजारी, ९५०३२१०२७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com