वाघुंडे (ता. पारनेर, जि. नगर) येथील अविनाश व सचीन या मगर बंधूंनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतीत सातत्याने प्रयोग केले आहेत. यंदा अडीच एकरांतील कलिंगड उन्हाळ्यात विक्रीस आले. मात्र कोरोना संकटाच्या लॉकडाऊनमध्ये पडलेले असतानाही हिमतीने थेट ग्राहक व व्यापारी असे सर्वतोपरी प्रयत्न करून एकूण सुमारे ८० ते ८५ टन मालाची विक्री यशस्वी केली. नफ्याचे प्रमाण घटले, मात्र मोठे नुकसान मात्र टळले. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वाघुंडे खुर्द येथील ज्ञानेदव मगर हे एसटी महामंडळातील सेवानिवृत्त चालक आहेत. त्यांची दहा एकर जमीन असून पैकी चार एकर बागायत तर सहा एकर जिरायती आहे. परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. त्यातील सचिन हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात फलोत्पादन विभागात कार्यरत आहेत. सध्या गुजरातमध्ये आणंद कृषी विद्यापीठात ते पीएचडी करीत आहेत. बंधू अविनाश त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शेतीची जबाबदारी पाहतात. कलिंगडाचा प्रयोग
मगर यांनी २००४ मध्ये दहा गुंठ्यात कलिंगड घेतले. त्यावेळी चांगली मागणी होती. त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी यंदा कलिंगडाचा प्रयोग केला. डाळिंबाची बाग काढल्यानंतर यंदा अडीच एकरांवर कलिंगडाचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. आधी हिरवळीचे खत म्हणून ताग घेतला. सचीन यांच्या ‘हॉर्टीकल्चर’ विषयातील तांत्रिक मार्गदर्शनाखाली पीक व्यवस्थापन केले. त्यातून चार किलोपासून बारा किलोपर्यत फळे मिळाली. एकरी सुमारे ४० टनांपर्यत उत्पादन घेतले. लॉकडाऊनमध्ये अडकले कलिंगड
उत्पादन चांगले आले असले तरी संकटांशी सामना करावा लागला. तोडणीच्या काळात अवकाळी पाऊस आला. शिवाय कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट समोर उभे ठाकले. त्यामुळे एकाचवेळी तोडणीी करुन साठवणूक करावी लागली. विक्रीचा मोठा प्रश्न समोर होता. व्यापारी किलोला केवळ २ ते ३ रूपये दर देऊ करीत होते. मात्र त्यातून केवळ नुकसानच पदरी पडणार होते. मग अविनाश व वडील ज्ञानदेव यांनी खचून न जाता शक्य तेवढी विक्री थेट ग्राहकांना व उर्वरित व्यापाऱ्यांना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जागेवर सुमारे १० टन मालाची विक्री केली. पुण्यात नातेवाईक असल्याने त्यांच्या मदतीने विविध निवासी सोसायट्यांना सुमारे १५ टन व उर्वरित नगर आणि नाशिक येथील बाजारपेठेत अशी एकूण ८० ते ८५ टनांपर्यंत विक्री झाली. दर किलोला सहा, सात ते दहा रूपयांपर्यंत मिळाला. अडीच एकरांत खर्च वजा जाता चार लाख रूपयांपर्यंचे उत्पन्न सुमारे ७० दिवसांमध्ये हाती आले. कोरोना संकट नसते तर किलोला १२ ते १४ रुपये दर मिळाला असता. नफ्याचे प्रमाण वाढले असते. तरीही विक्रीच्या केलेल्या सर्वतोपरी प्रयत्नांमधून मोठे नुकसान होण्याचा धोका कमी झाला. अन्य प्रयोग मगर कुटूंब जिरायती क्षेत्रावर ज्वारी, बाजरी व पारंपारिक पिके घेतात. सन २०१० पर्यंत त्यांनी फूलशेतीही केली. केरळ भागातून शेवग्याचे बियाणे आणून बांधावर पंचवीस झाडे लावली आहेत. स्वतःही बियाणे तयार करून चार हजार रुपये प्रति किलो दराने तर त्यापासून तयार केलेले रोप पंधरा रुपयांला प्रति नग दराने विक्री होते. दुष्काळाचा फटका
पारनेर तालुक्यातील वाघुंडेसह परिसरात सातत्याने पाणी टंचाईला सामारे जावे लागते. मात्र या भागातील शेतकरी अल्प पाण्यावर विविध पिके घेण्याचा सतत प्रयोग करतात. मगर यांनी २०१० मध्ये डाळिंबाची तीन एकरांत लागवड केली. साधारण पाच वर्षे उत्पादन घेतले. त्यातील उत्पन्नातून सहा एकर जिरायत जमीन खरेदी केली. सन २०१९ मध्ये दुष्काळामुळे पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली. त्याचा फटका बसला. त्यामुळे तीन एकरांवरील डाळिंब काढून टाकावे लागले. गेल्यावर्षी अडीच एकरांवर मका घेतला होता. मात्र पाऊस व लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे त्याचे उत्पादन शक्य झाले नाही. अन्यथा एकरी ३० क्विंटल उत्पादन निश्चित मिळाले असते. तरी देखील सुमारे दीड लाख रूपये किंमतीचा चारा विकून उत्पन्नाला हातभार लावल्याचे सचीन यनी सांगितले. रोपवाटिकेतून वाढले आर्थिक स्त्रोत
मगर कुटूंबाकडे कृषी विभागाचा परवाना असलेली रोपवाटिका आहे. त्यातूनच कुटूंबाचे आर्थिक स्त्रोत वाढवले आहेत. दरवर्षी डाळिंब, लिंबू, शेवगा आदींची काही लाख रोपे तयार करतात. अविनाश यांच्या मार्गदर्शनातून तयार केलेल्या डाळिंब रोपांना गुजरात राज्यात सर्वाधिक मागणी असून दरवर्षी साधारण एक लाख रोपे पाठवण्यात येतात. डाळिंबाच्या मातृवृक्षांसाठी एक एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. राहुरी परिसरातील एका शेतकऱ्याकडे साई सरबती व फुले सरबती हे लिंबाचे वाण आहेत. त्यांच्या आधारे निवड पध्दतीने रोपे तयार करण्यात येतात. शेतीला पोल्ट्री व्यवसायाची जोड देताना २००८ मध्ये पाच हजार पक्षांची करार शेती सुरू केली. त्यातून दर वर्षी आर्थिक आधार मिळाला. मजूर व पाण्याअभावी गेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद केला आहे. संपर्क- सचीन मगर- ७५८८५१७९६७