पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्‍वरी गटाची आघाडी

SHG meeting
SHG meeting

बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री भावेश्‍वरी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने गेल्या सोळा वर्षांपासून महिला आणि ग्रामविकासामध्ये चांगला सहभाग नोंदविलेला आहे. केवळ आर्थिक बचतीपर्यंत मर्यादित न राहता पूरक उद्योग, महिला सक्षमीकरणातून शाश्वत शेती आणि ग्राम विकासाच्यादृष्टीने पुढचे पाऊल बचत गटाने टाकले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बेलवळे खुर्द हे शेतीच्या दृष्टीने अग्रेसर गाव. याच गावातील २००३ साली दहा महिलांनी एकत्र येत श्री भावेश्‍वरी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची स्थापना केली. जिल्हा बॅंकेकडून आर्थिक सहाय्य घेत बचत गटातील सदस्यांनी हळूहळू प्रगती करण्यास सुरुवात केली. स्वस्त धान्य दुकान, खत विक्रीसारख्या आव्हानात्मक व्यवसायातही बचत गटांच्या महिलांनी लक्षणीय कामगिरी करताना एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामस्थांसाठी स्वस्त धान्य दुकान   बेलवळे खुर्द येथे रेशन धान्य दुकान नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांना आठ किलोमीटरची पायपीट करावी लागायची. शासनाकडून रेशन धान्य दुकान बचत गटांना देण्याबाबत आदेश आला होता. बचत गटाने हे आव्हान स्वीकारून स्वस्त धान्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. कागल तालुक्‍यात पहिल्यांदाच महिला बचत गटाला रेशन धान्य वितरित करण्याचा परवाना मिळाला. साडे आठ टन रेशन स्वत:च्या बचत गटातून भरल्यानंतर धान्य दुकान सुरू झाले. सध्या ग्रामस्थांना याच दुकानातून रेशन दिले जाते. २०११ पासून अविरतपणे बचत गटाच्या माध्यमातून रेशन दुकानातून धान्य दिले जाते. याशिवाय स्वतंत्र केरोसीन विभाग गटाच्या मार्फत चालविण्यात येतो. वर्षाला लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होते. स्वस्त धान्य विक्री केंद्रात कॅशिअर म्हणून एक महिला काम बघते. तर मदतनीस म्हणून एक मजूर कार्यरत आहे. बायोमेट्रीक पद्धत सुरू होण्याअगोदर संगणकीकृत पावत्याद्वारे रेशन दिले जात होते. बायोमेट्रीक पद्धत आल्यापासून यात आणखी पारदर्शकता आली. महिला सदस्या रेशन दुकान चालवत असल्याने गैरप्रकार टाळण्यास मदत झाल्याचे बचत गटाच्या सदस्यांनी सांगितले. विविध योजनांची पूर्तता बचत गटाला अनेक शासकीय विभागाची मदत मिळते. गटाने यापूर्वी अनुदानावर बियाण्यांचे वाटप केले आहे. वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत चवळी बियाणे, मका वाटप केले आहे. याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तूर बियाणे, लिंबू रोपे, कोकोपीट वाटपही केले आहे. याचा फायदा गावातील शेतकऱ्यांना झाला आहे. खत विक्रीचे नियोजन बचत गटाच्या मार्फत खत विक्रीचा परवाना घेण्यात आला आहे. वर्षाला सुमारे तब्बल सत्तर लाख रुपयांच्या खतांची विक्री गटामार्फत केली जाते. बचत गटाच्या दृष्टीने हा एक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. याचे नियोजनही महिलांच्या मार्फत केले जाते. खतटंचाईच्या काळात गटाने शेती बांधावर थेट खताचे वाटप केले होते. दुग्ध व्यवसायाला चालना  बचत गट स्थापन झाल्यापासून  गटातील सदस्यांना प्रत्येकी दोन म्हशींचे वाटप करण्यात आले. गट स्थापनेपूर्वी गटातील महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण गट स्थापन झाल्यानंतर महिलांना म्हैसपालनातून उत्पन्नाचा चांगला आधार मिळाला आहे. सध्या गटातील महिलांकडे २० जातिवंत दुधाळ म्हशी आहेत. जिल्हा बॅंकेचे मोलाचे सहकार्य  बचत गटाच्या प्रगतीसाठी जिल्हा बॅंकेने चळवळीला मोठे योगदान दिले. वेळच्या वेळी गटाला कर्जपुरवठा करून बचत गटाच्या महिलांना आर्थिक मदत केली आहे. बॅंकेचे अध्यक्ष आणि सध्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून बचत गटाला सातत्याने मार्गदर्शन आणि मदत होत असल्याचे बचत गटातील महिलांनी सांगितले. राज्यातील विविध बॅंकातील चाळीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन बचत गटाच्या उपक्रमांची माहिती घेत कौतुक केले.

जबाबदारीचे वाटप

  • सौ. साधना कोतेकर (अध्यक्ष) ः गटाच्या कामकाजाचे नियोजन, गुंतवणुकीचे मार्ग तयार करणे. गटाचे कार्य लोकांपर्यंत, शासनापर्यंत पोचविणे.
  • सौ. रुपा पाटील (सचिव) ः गटाचा हिशेब, सभा नियोजन, बॅंक व्यवहार, नवीन तंत्रज्ञान माहिती. धान्य, केरोसीन विभागाचे नियोजन.
  • सौ. लक्ष्मी पाटील (खत विभाग प्रमुख) ः खरेदी विक्री आणि वसुलीची जबाबदारी.
  • सौ. नम्रता पाटील  (अवजारे बँक प्रमुख) ः कृषी अवजारे पुरविणे, देखभाल, वसुलीचे नियोजन.
  • एक कोटी रुपयांच्यावर उलाढाल  बचत गटाने आपल्या कामाने अनेकांना प्रभावित केले. चिकाटीने विविध विभाग सुरू केले. स्वस्त धान्य दुकान, केरोसीन वाटप विभाग, खते विभाग, कृषी यांत्रिकीकरण विभाग या माध्यमातून दरवर्षी एक कोटी रुपयांच्यावर उलाढाल बचत गटामार्फत केली जाते. यातून बचत गटास निव्वळ नफा दहा लाखापर्यंत रहात असल्याचे सचिव सौ. रुपा पाटील यांनी सांगितले. २०१६-१७ संस्थेला सव्वा सहा लाख रुपयांचा नफा मिळाला. २०१७-१८ मध्ये यात वाढ होऊन नफा ७ लाख ९२ हजार रुपयांवर पोचला. २०१८-१९ मध्ये गटाचा नफा ९ लाख २१ हजारांवर पोचला आहे. चांगल्या व्यवस्थापनामुळे नफ्यात वाढ होत आहे. संस्थेने स्वस्त धान्य दुकानासाठी २ लाख रुपये, केरोसीन वाटप विभागासाठी १ लाख रुपये, खते विभागासाठी ३० लाख रुपये, तर कृषी यांत्रिकीकरण विभागात २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. येत्या काळात महिलांची गटशेती करण्याचे नियोजन गटाने केले आहे.

    बचत गट भरतो आयकर  बचत गट हे महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी स्थापन केले जातात. काटेकोर नियोजन केल्यास किती नफा होऊ शकतो हे श्री भावेश्‍वरी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने दाखवून दिले आहे. गेल्या चार वर्षापासून हा गट आयकर भरतो. गेल्या काही वर्षापर्यंत बचत गट पाच हजार रुपये आयकर भरत होता. यात वाढ होऊन नुकत्याच झालेल्या आर्थिक वर्षात बचत गटाने दहा हजार रुपयांचा आयकर भरला आहे. गटाचे लेखापरीक्षण हे मान्यता प्राप्त लेखापरीक्षकांकडून केले जाते.

    कृषी अवजारे बॅंक  शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी विभागाच्या साहाय्याने बचत गटाने कृषी अवजारे बॅंक सुरू केली. कृषी विभागाने गटाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यासाठी प्रोत्साहित केले. एकाच छताखाली शेतकऱ्यांना अवजारे उपलब्ध करून दिली जातात. वेळच्या वेळी मशागती होत असल्याने शेतकऱ्यांचा त्रास वाचला आहे. बॅंकेमार्फत ट्रॅक्‍टर, भात मळणी यंत्र, सोयाबीन मळणी यंत्र, पल्टी, डबल पल्टी, रोटर, बांडगे, सरी, रेझर, फळी, लेव्हलर, आदि साधने भाडेतत्त्वावर दिली जातात. गटामार्फत योग्य दरामध्ये ही अवजारे भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना दिले जातात. इतर विभागाच्या तुलनेत या विभागाला नाममात्र नफा मिळत असला तरी शेतकऱ्यांची चांगली सोय होत असल्याने ही बॅंक कोणत्याही अडथळ्याशिवाय चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

    संपर्क - सौ. रूपा पाटील (सचिव) ः  ७५८८६२१५३०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com